हिंदू मतासाठी भाजपची चाचपणी; मुंबईतील ३६ मतदारसंघांत भाजपची खास रणनीती

| Updated on: Aug 02, 2024 | 9:54 AM

BJP Vidhansabha Election : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी एक खास प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार, आता भाजपने मुंबईवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी भाजप खास रणनीती आखत आहे. हिंदू मतांवर भाजपचा डोळा आहे.

हिंदू मतासाठी भाजपची चाचपणी; मुंबईतील ३६ मतदारसंघांत भाजपची खास रणनीती
भाजपचा हिंदू मतांवर डोळा
Follow us on

लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील विविध भागातील डॅमेज कंट्रोलसाठी बैठकांचे सत्र सुरु असतानचा आता मुंबईत मोठा खेला करण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. भाजपने मुंबईवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी भाजप खास रणनीती आखत आहे. हिंदू मतांवर भाजपचा डोळा आहे. उद्धव ठाकरे सेनेला शह देण्यासाठी खास प्लॅन आखण्यात आला आहे. तर राज्यातही हिंदुत्वाच्या मुद्दावर भाजप आक्रमक दिसेल.

काय आहे रणनीती

प्रत्येक मतदारसंघात तळागाळात फिरून भाजप स्वतंत्र अहवाल तयार करणार आहे. या अहवालाच्या आधारे कोणाला परत संधी द्यायची आणि कोणत्या मतदारसंघात नवा चेहरा द्यायचा, हे ठरवले जाणार आहे. विशेष म्हणजे एकगठ्ठा मुस्लीम मतदारांवर जालीम उपाय म्हणून या प्रयोगावर भर देण्यात येत आहे. मुंबईमधील ३६ मतदारसंघातील सर्व हिंदू मतदार कसा एकत्रित मतदानासाठी रस्त्यावर उतरवता येईल, यासाठी या अहवालाच्या माध्यमातून विशेष रणनीती आखली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे यांना शह देण्यासाठी खास प्लॅन

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लीम मतदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. शिवाय उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले आहेत. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी मुत्सद्दीपणे मुस्लीम मते पक्षाकडे आकर्षित केली. त्यामुळे भाजपलाही पक्षाकडे नवे मतदार वळवण्यासाठी काय करावे लागेल,यादृष्टीनेही या अहवालाच्या माध्यमातून चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते.

हिंदुत्वाचे कार्ड खेळणार

विधानसभेसाठी आता भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड अधिक तीव्र होणार आहे. येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार असल्याचे समोर आले आहे. लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहादच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार आहे.संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदुना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणतील. धारावीतल्या अरविंद वैश्य याची हत्या आणि उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची हत्या या दोन्ही मुद्द्यावर देखील भाजप अधिक आक्रमक होत आहे.हिंदू मतदारांमध्ये देखील भाजपकडून जनजागृती केली जाणार आहे.