BJP : भाजप विधानसभेत हिशेब करणार चुकता; लोकसभेतील पराभूत उमेदवारांच्या बैठकीत कोणत्या ‘आणाभाका’

| Updated on: Jun 27, 2024 | 9:06 AM

BJP Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील हाराकिरी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे केलेली घौडदौड महायुतीला मोठी खिंडार पाडणारी ठरली. पराभवाची कारणे शोधण्यात येत आहे. त्याची समीक्षा करण्यात येत आहे.

BJP : भाजप विधानसभेत हिशेब करणार चुकता; लोकसभेतील पराभूत उमेदवारांच्या बैठकीत कोणत्या आणाभाका
मोठी खलबतं, पराभवाचा काढणार वचपा
Follow us on

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने प्रदेश भाजपच्या अनेक स्वप्नांवर पाणी फेरले आहे. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याने त्यांचा वरचष्मा होता. लोकसभा जागा वाटपापासून ते नियोजनापर्यंत भाजपचा थेट दबदबा दिसून आला. घटक पक्षातील जागांमध्ये पण भाजपने तिकीट कुणाला द्यायचे याचे आराखडे आखले होते. लोकसभा निवडणुकीत डबल इंजिन सरकार जबरदस्त मुसंडी मारण्याची कवायत झाली असली तरी प्रत्यक्षात राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. ही हाराकिरी भाजपच्या जिव्हारी लागली. भाजप येत्या विधानसभेत सव्याज त्याची परतफेड करण्याच्या तयारीत आहे.

पराभवाची जातकुळी काढली शोधून

भाजपने लोकसभेतील सर्व पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला जवळपास सर्वच पराभूत उमेदवार उपस्थित होते. बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पराभूत उमेदवारांशी समोरासमोर चर्चा केली. पराभवाची जातकुळी कोणती, पराभव नेमका कशामुळे झाला. महायुतीत कोणी काम केले. कोणी मदत केली. कोणी वेळेवर अंग काढून घेतले. बुथनिहाय काय घडले. कुठे कमी मते पडली. कोणत्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक फटका बसला. कोणी वेळेवर हात दिला. कोणी इतर पक्षांना आतून मदत केली, याविषयी पराभूत उमेदवारांच्या मनातील खदखद एकदाच बाहेर आली. त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर घटनांचा आणि कारणांचा पाढाच वाचला. ही सर्व गोळाबेरीज आता विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कामी येणार आहे.

हे सुद्धा वाचा

समीक्षा करुन ठरणार रणनीती

लोकसभेतील पराभवावरुन महायुतीतील घटक पक्षात कारण मीमांसा सुरु आहे. महायुतीत पराभवावरुन धुसफूस पण सुरु आहे. अजित पवार गट सध्या टार्गेटवर आला आहे. भाजप आणि शिंदेसेनेतून अजित पवार गटाविषयी नाराजीचा सूर आळवल्या जात आहे. तर अजितदादा गोटातील तडफदार नेते त्याला प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच आता भाजपने लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांची बैठक घेतली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यात आली.ही समीक्षा करून येत्या विधानसभा निवडणुकीत रणनीती ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. पराभवाच्या कारणांमधून धडा घेत महायुती विधानसभेत उतरणार आहे. त्यात पराभवाचे उट्टे काढण्यात येतील. अर्थात महाविकास आघाडीला फटका देताना महायुतीत ज्यांनी मदत केली नाही, त्यांना सव्याज परतफेड होऊ शकते, हे वेगळे सांगायची गरज आहे का?