Vinayak Raut : नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाचे समन्स; विनायक राऊत यांनी खासदारकी रद्द करण्यासाठी दाखल केली आहे याचिका

| Updated on: Aug 16, 2024 | 12:38 PM

Mumbai High Court : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार करुन विजय मिळवल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकरणात राणे यांना हायकोर्टाने समन्स बजावले आहे.

Vinayak Raut : नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाचे समन्स; विनायक राऊत यांनी खासदारकी रद्द करण्यासाठी दाखल केली आहे याचिका
नारायण राणे, विनायक राऊत
Follow us on

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकारणात पुन्हा शिमगा सुरु झाला आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांनी भष्ट्राचार करुन विजय मिळवल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेवर ठाकरे गटाने मोठा आक्षेप नोंदवला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांनी सदर याचिका दाखल केली होती. याप्रकरणात हायकोर्टाने खासदार नारायण राणे यांना समन्स बजावले आहे.

निवडणुकीत मते घेतली विकत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत मते विकत घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राणे यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करत त्यांनी राणे यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

याचिकेतील आरोप काय

नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचे याचिकेत म्हटले आहे.नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही.आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करावी. त्यांची खासदारकी रद्द करावी. 7 मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे, असे घोषीत करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.