Ganpati Festival मुंबई: गणेश मंडळांनी गणेश आगमन किंवा विसर्जनादिवशी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नये अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना केल्या आहेत. नाच-गाण्यांमुळे दाब येऊन पुलाचे आणखी नुकसान होऊ शकते. त्यामुळे गणेश भक्तांनी सावधानता बाळगून पुलावर जास्तवेळ रेंगाळू नये. त्यांनी शांतपणे पूल पार करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाने सर्वच गणेश मंडळांना केलं आहे.
मुंबईत गेल्या काही काळात पूल कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय.
मुंबईतील गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते असतात. हे हजारो कार्यकर्ते गणेश आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीत जल्लोषाने नाचत असतात. परिणामी रस्त्यांवरील पुलांवर त्याचा मोठा दाब येतो.
मुंबईतील पूल हे अनेक वर्षे जुने आहेत. त्यामुळे आधीच जर्जर झालेल्या या पुलांवर अतिरिक्त दाब पडल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच प्रशासनाने गणेश मंडळांना आवाहन करत, या पुलांवर जास्तवेळ न रेंगाळता, विसर्जन मिरवणुका तातडीने पुढे नेण्याच्या सूचना आता केली आहे.
येत्या 2 सप्टेंबरला गणेश आगमन होत आहे. तर 12 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.