Uddhav Thakeray : वर्षभराने का होईना सरसंघचालक बोलले तरी, आता मोदी,शाह काश्मीरमध्ये कधी जाणार?, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

| Updated on: Jun 12, 2024 | 3:16 PM

Uddhav Thakeray Attack On PM Modi : जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी आज तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चौफेर टीका केली.

Uddhav Thakeray : वर्षभराने का होईना सरसंघचालक बोलले तरी, आता मोदी,शाह काश्मीरमध्ये कधी जाणार?, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
Uddhav thackeray
Follow us on

जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकार अनेक दिवसांपासून मूग गिळून गप्प बसल्याबाबत आणि तिथल्या परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तोफ डागली. गेल्या 48 तासांत काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी डोके वर काढले आहे. तीन ठिकाणी हल्ले झाले आहेत. तर चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागातील परिस्थिती पाहता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मातोश्रीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

सरसंघचालकांना चिमटा

मणिपूर एका वर्षांपासून जळत असल्याचे सांगत, त्यांनी याप्रकरणी सत्ताधाऱ्यांपैकी कोणीच त्या भागात गेले नसल्याचा आरोप केला. मणिपूरच्या विषयावर काल आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले होते. त्यावर ठाकरे यांनी भागवत यांना चिमटा काढला. निदान वर्षभराने भागवत या विषयावर बोलले तरी, असे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘अब की बार’ वाले गेले कुठे?

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले. ही जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल करत त्यांनी ‘अब की बार’वाले कुठे गेले असा टोला भाजपला हाणला. देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होते आहे. मणिपूर इतक्या दिवसांपासून धुमसत आहे, पण सत्ताधाऱ्यांपैकी कोणीच तिकडे जात नसल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीत गाजावाजा, आता जाणार की नाही?

लोकसभा निवडणुकीत भाजपने जम्मू-काश्मीरचा मुद्दा प्रचारात आणला होता. 370 कलम हटविल्याचे प्रचार सभेत सांगण्यात येत होते. त्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. कलम 370 हटविल्याचा या लोकांनी ढोल बडवला. मात्र तिथलं सत्य काय हे आम्ही जनतेसमोर आणलं. त्यावर हे लोक आता काहीच बोलणार नाही. हे कलम हटवून काय फरक पडला? असा सवाल त्यांनी केला. तिकडे लोकांचे जीव जात असताने हे लोक तिसऱ्यांदा सरकार आणल्याची जाहिरात करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. आता पंतप्रधान, गृहमंत्री जम्मू-काश्मीरला जाणार का? असा सवाल त्यांनी केला. मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधान पदावर बसण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले.