महायुती -महाविकास आघाडीचा 36 चा आकडा सुटेना; अनेक जणांचे गुडघ्याला बाशिंग, मेदवारांची घोषणा केव्हा?

| Updated on: Oct 26, 2024 | 12:39 PM

Maharashatra Vidhansabha Election 2024 :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी काही जागांवर अजूनही सहमती झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीत या जागांवरून 36 चा आकडा झाला आहे. काय आहे हा 36 जागांचा पेच? कधी सूटणार हे त्रांगडे? 

महायुती -महाविकास आघाडीचा 36 चा आकडा सुटेना; अनेक जणांचे गुडघ्याला बाशिंग, मेदवारांची घोषणा केव्हा?
महायुती महाआघाडी
Follow us on
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक बैठकांचे सत्र झाल्यानंतर जागा वाटपावर सहमती झाली. तर  काही जागांवर बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. जागा वाटपात महाविकास आघाडीत अधिक खलबतं झाली. तर महायुतीत तोडगा काढण्यासाठी दिल्लीत मॅरेथॉन बैठकी घेण्यात आल्या. त्यात अनेक जागांवर सहमती झाली. पण राज्यात महाविकास आणि महायुतीने राज्यातील 36 जागांवर उमेदवारी जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या छत्तीसचा आकडा असला तरी जागा वाटपात पण दोघांनीच हाच आकडा गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या ठिकाणी आहे पेच 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 36 मतदारसंघ असे, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महायुतीत 11 जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मविआच्या जागा वाटपात 36 पैकी विदर्भातील 13 मतदारसंघांचा समावेश असून, त्यात अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, अर्णी  या ठिकाणांचा समावेश आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या ठिकाणी देखील काही जागा उमेदवारीविना राहिल्या आहेत. यापैकी 15 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, ज्यात प्रामुख्याने अकोट, गडचिरोली, बोरीवली, पेन, मालशिरस, आणि पंढरपूर या जागांचा समावेश आहे. दुसरीकडे, महायुतीचे 11 उमेदवार आणि महाविकास आघाडीचे 30 उमेदवार अजूनही जाहीर व्हायचे आहेत.
मुंबईतील या जागांवर पेच 
महायुतीत 288 जागांपैकी 278 जागांवर सहमती झाली आहे. गुरूवारी दिल्ली दरबारी तीनही पक्षांची बैठक झाली. त्यात अनेक जागांवर तोडगा निघाला. पण मुंबईतील काही जागांवरील पेच कायम आहे. वरळी, शिवडी, चेंबूर, बोरिवली, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, अंधेरी पूर्व, वर्सोवा, मुंबादेवी, कलिना आणि धारावी या जागांवर आज काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून महत्वाची चर्चा  करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी महायुतीची अंतिम यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आहे.