‘नीट’ परीक्षा खाजगी क्लासेस घेणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेलीय का? अमित ठाकरे आक्रमक

| Updated on: Jun 11, 2024 | 5:55 PM

नीट परीक्षेवरून देशभरात गोंधळ सुरू आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जात आहे. अशातच यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.

नीट परीक्षा खाजगी क्लासेस घेणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेलीय का? अमित ठाकरे आक्रमक
Follow us on

देशभरात नीटपरीक्षेच्या निकालावरून वाद होत असल्याचं दिसत आहे. परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केलीये. अशातच मनसे अध्य राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनीही यावरून टीका केली आहे.

हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? 67 मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? ‘नीट’ ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का? परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने. हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नव्हे, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. ‘नीट’ परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट:-

पेपर फुटीचा नेमका वाद काय?

देशभरात झालेल्या नीट परीक्षेसाठी 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. या पराक्षेचा 4 जूनला निकाल लागला आणि या परीक्षेमध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क पडले. इतकंच नाहीतर या 67 मधील सहा विद्यार्थी हे हरियाणामधील एकाच सेंटरमध्ये परीक्षेला बसले होते. परीक्षेत मायनस मार्किंग सिस्टिम असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे पडले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.