स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले

| Updated on: Sep 21, 2024 | 7:51 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी व्हिजन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना ठाकरेंनी बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर भाष्य केलं. तुम्ही शांत बसणार, तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले.

स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
Follow us on

गेल्या अनेक महिन्यापासून बीडीडी चाळीचे लोक येत आहेत. पोलीस बांधव येतात. कोळीवाड्याचे बांधव येतात. चर्चा करत आहेत. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात ना. तुम्ही मुंबईचे मालक ना. तुम्ही कसले रडत आहात. बाहेरच्या राज्यातील लोक येतात इकडे झोपड्या बसवतात आणि फुकटात घरं घेऊन जातात. याचं कारण तुम्ही योग्यवेळी योग्य ताकद दाखवत नाही. एरव्ही पाच वर्ष भांडणार आणि ऐन मोक्याच्यावेळी घरंगळणार. समोरच्यांना माहीत आहे. हे जाऊन जाऊन जाणार कुठे. त्यामुळे तुमचे प्रकल्प रखडतात. बाहेरच्या लोकांची टगेगिरी सुरू होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना गोष्टी मिळतात, असं राज ठाकरे म्हणाले.

बीकेसीत 20 वर्षापूर्वी तिकडच्या झोपडीधारकांना अनधिकृत झोपड्या. त्यांना ऑफर होती घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळेल. अन् आपल्याकडे काय चाललंय एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या. दोन कुटुंबामागे एका गाडीचं पार्किंग हा अजब प्रकार ऐकला. आज हा चालवणार उद्या तो चालवणार. तुम्हाला किंमत नाहीये हे लक्षात घ्या. एवढा मोठा प्रकल्प येतो. तेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी बोललं पाहिजे, तुमची मते घेतली पाहिजे, अशी कोणतीही गोष्ट न घेता प्रकल्प तुमच्यावर लादायचा आणि नंतर तुम्हाला विचारायचं. हे फक्त वरळीत सुरू नाही, राज्यात जागोजागी सुरू असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठी टक्का असलेल्या ठिकाणी या गोष्टी सुरू आहे. हे तुमच्याबाबत करत आहेत. जे तुम्हाला शासन म्हणून मिळालं. त्यांनाच मतदान झालं, त्यांचे आमदार आले. खासदार आले. त्यामुळे तुम्ही कोण असं त्यांना वाटतं. जे आम्हाला मान्य होईल तेच करू असं त्यांना वाटतं. असंच धोरण राबवायचं असेल तर असंच होणार. तुम्ही फक्त आरडाओरडा करणार. तुमच्या पुढे चार तुकडे टाकणार. तुम्ही शांत बसणार, तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या, असंही ठाकरे म्हणाले.