धारावीकरांचा पोलीस स्टेशनला घेराव; खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Sep 21, 2024 | 12:16 PM

Dharavi Mosque Demolished Issue : मुंबईतील धारावीत तणावपूर्ण वातावरण आहे. धारावीकरांचा पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खासदार वर्षा गायकवाड धारावीत दाखल झाल्या आहेत. धारावीमध्ये नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

धारावीकरांचा पोलीस स्टेशनला घेराव; खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?
धारावीत तणावपूर्ण वातावरण
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबईतील धारावी भागात आज तणावपूर्ण वातावरण आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडला. त्यामुळे धारावीत मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या वाहनांचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या पथकाच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. धारावीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धारावीच्या माजी आमदार आणि उत्तर- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त देखील धारावीत दाखल झालेत.

धारावीत नेमकं काय घडतंय?

धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडल्याने तणापूर्ण वातावरण आहे. आज सकाळी मुंबई महापालिकेचं पथक धारावीत दाखल झालं. बीएमसीचं पथक धारावीत आल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना अडवलं. संतप्त नागरिकांनी बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडल्या. तर रस्ताही अडवण्यात आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बंदोबस्त वाढवला. स्थानिकांनी चर्चा करत पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थितीवर मार्ग काढायला सुरुवात केली. पण सध्या धारावीत तणावपूर्ण परिस्थिती आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. धारावी पोलीस स्टेशनबाहेरही नागरिकांचा जमाव आहे. धारावी पोलीस स्टेशनला धारावीकरांनी घेरलं आहे.

वर्षा गायकवाड धारावीत

मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धारावीत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. खासदार वर्षा गायकवाडदेखील धारावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धारावीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मला त्याबद्दलची कल्पना नाही. मी सध्या नागपूरला आहे. अशी जाती-जाती मधील तेढ ज्या पद्धतीने वाढवली जात आहे. हिंदू राहील किंवा मुस्लिम राहील अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार करत आहेत. असं न करता गुण्यागोविंदाने धारावी विकसित करायची आहे. तर त्याच ठिकाणी रहिवाशांचा पुनर्वसन झाला पाहिजे. मस्जिद हे तर धार्मिक स्थळ आहे. त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि विश्वासात घेऊनच हे केले पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.