Video : काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई लोकलची स्थिती काय?

| Updated on: Sep 26, 2024 | 10:51 AM

Mumbai Local Status : राज्यात कालपासून मुसळधार पाऊस होतोय. मुंबईमध्येही जोरदार पाऊस बरसतोय. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काल हाल झाले. त्यानंतर आज लोकलची काय स्थिती आहे? रेल्वे सुरुळित सुरु आहे का? मध्य रेल्वेची काय स्थिती आहे? वाचा सविस्तर...

Video : काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई लोकलची स्थिती काय?
Follow us on

काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आता आज मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने काल रेल्वेसेवा विस्कळित होती. आजही तशीच परिस्थिती आहे. आजही मध्य रेल्वे विस्कळित आहे. अंबरनाथ कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या रेल्वे उशीराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कामासाठी निघालेल्यांची रेल्वे स्टेशनवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे आज पुन्हा एकदा विस्कळीत झालीय. कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम कायम आहे. कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहेत. धिमी लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे जलद लोकल्स 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; कल्याण सह अंबरनाथ बदलापूर आणि इतर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं होतं. रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. आज शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. तर आज मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मॅनहोल पडून महिलेचा मृत्यू

मॅनहोलमध्ये वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरी ईस्ट सीप्सजवळ ही घटना घडली. रात्री नऊ वाजता ही महिला काम संपवून घराकडे जात असताना मुसळधार पाऊस पडत होता आणि रस्त्यावर पाणी तुंबले होते. रस्ता ओलांडण्यासाठी महिला डिवाइडरवर चढली असता अचानक नाल्यात पडले. त्यावेळी डिवाइडरवरील नाला उघडा होता आणि सर्वत्र पाणीच पाणी होते, हे महिलेला समजले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध सुरू केला. रात्री 11.30 वाजता दूरच्या नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. विमल आप्पाशा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत असून, या महिलेचा मृत्यू अत्यंत निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप होत आहे.