‘ईडी’चा वापर करून भाजप लोकशाही मारतंय; संजय राऊतांचा घणाघात

| Updated on: Feb 03, 2024 | 8:54 AM

Saamana Editorial on Hemant Soren ED Action : देश लुटणारे बाहेर अन् सोरेन आतमध्ये... मोदी काळात यापेक्षा वेगळे काय घडणार?; सामनातून निशाणा. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अटकेवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. सामनात काय म्हणण्यात आलं आहे? वाचा...

ईडीचा वापर करून भाजप लोकशाही मारतंय; संजय राऊतांचा घणाघात
Follow us on

मुंबई | 03 फेब्रुवारी 2024 : ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवरच करण्यात येत असल्याने विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे झारखंडचं राजकारण नव्या वळणार येऊन ठेपलं आहे. यावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. सोरेन अटकेचा धिक्कार! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

‘ईडी’चा वापर करून भाजप लोकशाही मारत आहे. विरोधकांना छळत आहे. भाजपचे लोक आजही आणीबाणीच्या आठवणी काढून कळवळतात. मग आजचा मोदी काळ आणीबाणीपेक्षा भयानक आहे. आणीबाणी काळात जयप्रकाश नारायण, चरणसिंग आदी नेत्यांनी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले होते की, ”सरकारचे चुकीचे आदेश पाळू नका, हीच देशसेवा आहे.” आजही आम्ही तेच आवाहन करीत आहोत.

अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश पाळणे हा देशद्रोहच ठरेल. मोदी-शहा येतील व जातील. अनेक जगज्जेते आले गेले, तेथे भाजपवाले कोण? देश टिकायला हवा. भारतमातेला अमरत्व आहे, मोदी-शहांना नाही. हेमंत सोरेन यांच्या अटकेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. देश लुटणारे बाहेर व सोरेन आतमध्ये. मोदी काळात यापेक्षा वेगळे काय घडणार?

भारतीय जनता पक्षाच्या ‘ईडी’ विभागाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यास अशा पद्धतीने अटक करणे योग्य नाही. इतिहासात असे घडले नव्हते. सोरेन यांच्या अटकेसाठी रांची परिसरात सात हजार सशस्त्र जवान तैनात केले होते. इतकी तयारी चीनच्या सीमेवर केली असती तर चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसून त्यांनी हजारो वर्ग मैल जमीन ताब्यात घेतली नसती, पण सहा-सात एकर जमिनीचे एक जुने प्रकरण उकरून ‘ईडी’ने हेमंत सोरेन यांना ताब्यात घेतले. देशात भाजप व त्यांच्या मालकांचा दहशतवाद आता उच्च थरावर पोहोचला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भाजपच्या ‘ईडी’ विभागाने सातवे समन्स पाठवले आहे व केजरीवाल यांनाही कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीय लोकांवर, आर्थिक व्यवहार सांभाळणाऱया लोकांवर ‘ईडी’ने गेल्या दोनेक महिन्यांत धाडी टाकल्या व लगेच नितीश कुमार हे भाजपशी चौथे लग्न लावून नांदायला गेले. हेमंत सोरेन यांनी भाजपपुढे वाकण्यास नकार दिला व त्याची पिंमत त्यांनी चुकवली. देशाच्या दृष्टीने हेमंत सोरेन हे ‘हिरो’ ठरले आहेत.