मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?

| Updated on: Sep 27, 2024 | 4:21 PM

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने खाते उघडलं आहे. ओबीसी प्रवर्गातून युवासेनेचे मयूर पांचाळ विजयी झाले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?
Follow us on

Mumbai University Senate Election First Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. आता नुकतंच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने खाते उघडलं आहे. ओबीसी प्रवर्गातून युवासेनेचे मयूर पांचाळ विजयी झाले आहेत. मयूर पांचाळ यांना 5 हजार 350 मते मिळाली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. सध्या निवडणुकांच्या मतमोजणी सुरु आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेनं (MNS)  एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेला नाही. या निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेकडून ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ विजयी झाले आहेत.

मतमोजणीही पूर्ण

या निकालानंतर आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. “मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यात ज्या पाच राखीव जागा आहे, त्याची मतमोजणीही पूर्ण झालेली आहेत. त्यात ज्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला, तेवढीच तांत्रिक बाब बाकी आहे. या पाचही जागांवर युवासेनेने निर्णायक आघाडी घेतली आहे. १० पैकी पाच जागा या युवासेना जिंकली आहे”, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

युवासेनेचे पाच उमेदवार विजयी

“यानंतर खुल्या गटाची मतमोजणी होईल. अर्ध्या तासात मुंबई विद्यापीठाकडून सर्व जागांचा निकाल जाहीर करेल. ओबीसी गटातून मयूर पांचाळ, एससी गटातून धनराज कोचाडे, महिला गटातून स्नेहा गवळी, एसटी गटातून शितल शेठ, एनटी गटातून शशिकांत खोरे या सर्वांनी पाच हजार मतांनी आघाडी घेतली आहे. अभाविप यांनी ८०० ते १००० मते घेतलेली आहे. त्यामुळे या पाच उमेदवारांना ४ हजारांची निर्णायक आघाडी घेऊन युवासेनेचे पाच उमेदवार हे विजयी झालेले आहेत. जसे जसे निकाल येतील, तसे आम्ही तुम्हाला सांगू”, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले.