…तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?

| Updated on: Sep 22, 2024 | 12:26 PM

Prakash Ambedkar- Ramdas Athawale : रिपब्लिकन ऐक्याची पुन्हा एकदा हाक देण्यात आली आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गटात एकोपा साधण्यासाठी यपूर्वी पण प्रयत्न झाले आहेत. विविध गटा-तटात विखुरलेले नेते एकत्र यावेत ही समाजाची पण इच्छा आहे, रामदास आठवले यांनी निवडणुकीच्या तोंडावर या मुद्याला हवा दिली आहे.

...तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?
रिपब्लिकन ऐक्यासाठी कोण कोण समोर येणार?
Follow us on

रिपब्लिकन ऐक्य हे तर समाजाचं स्वप्न आहे. विविध गटा तटात विखुरलेल्या नेत्यांनी एक मोट बांधून निवडणुकीला सामोरं जावं अशी समाजाची इच्छा आहे. यापूर्वी पण अनेकदा रिपब्लिकन ऐक्याचे हाकारे देण्यात आले. चार दिशेला चार मतांपेक्षा एकत्र येत सत्ताधारी जमातीचे स्वप्न अजून समाज ऊराशी बाळगून आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा या मुद्याला हवा दिली आहे. त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचा नारा दिला आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना भावनिक साद घातली आहे.

तर ते उपमुख्यमंत्री असते

प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवूनही त्यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी एनडीएमध्ये यावे. त्यांना मंत्रीपद देण्यासाठी मी मदत करेल. प्रकाश आंबेडकर माझ्या सोबत राहिले असते तर उपमुख्यमंत्री बनू शकले असते.
आम्ही दोघे एकत्र असतो तर त्याचा मोठा फायदा झाला असता. त्यांनी माझ्या सोबत यायला पाहिजे. त्यामुळे बहुजन एकत्रित येतील त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावं. त्यांनी सोबत यायला पाहिजे एकटे राहून सत्तेत येता येत नाही, असे सत्तेचे गणित सुद्धा रामदास आठवले यांनी मांडले.

हे सुद्धा वाचा

सगळ्या गटांना एकत्रित येण्याचे आवाहन

रिपब्लिकन पक्षाचा एकीकरण करण्यासाठी सगळ्या गटांनी एकत्रित येण्याची गरज आहे. फक्त एकट्याने किंवा दोघांनी येऊन चालणार नाही. प्रकाश आंबेडकर जर पुढाकार घेत असतील तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार नाही. माझी पॉझिटिव्ह भूमिका आहे. आणि माझा त्याला पाठिंबा आहे. माझा त्यांना पाठिंबा असेल. प्रकाश आंबेडकर शिवाय रिपब्लिकन ऐक्य शक्य होणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.

तर आठवलेंची वेगळी भूमिका?

उद्धव ठाकरे हे युती मध्ये असताना त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या मात्र त्यावेळी 3 दोनचा फॉर्म्युला स्वीकारा असं मी म्हटलं होतं. मात्र त्यावेळी तो दोघांनी सुद्धा स्वीकारला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याला पसंती दिली, असं ते म्हणाले.

आमची ताकत कमी आहे असं समजू नये आमची ताकत गाव पातळी पर्यंत आहे. याचा विचार करावा आणि आमच्यासाठी झुकत माप घ्यावं असे आवाहन त्यांनी महायुतीला केलं आहे. राजकारणात वैचारिक फटके देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा सुद्धा आठवले यांनी यावेळी दिला. त्यामुळे आठवले वेगळी राजकीय भूमिका घेतील का? असा प्रश्न समोर येत आहे.