नुसते रस्ते बांधणं म्हणजे प्रगती नव्हे; राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

| Updated on: Oct 12, 2024 | 10:18 AM

Raj Thackeray Podcast About Dasara : विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंचं जनतेला महत्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसंच योग्य उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. 'राजमुद्रा' या पॉकास्टच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा...

नुसते रस्ते बांधणं म्हणजे प्रगती नव्हे; राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा
राज ठाकरे
Image Credit source: Facebook
Follow us on

आज दसरा सणाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘राजमुद्रा’ या पॉकास्टच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं जनतेला महत्वपूर्ण आवाहन केलं आहे. हीच क्रांतीची वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता. आणि नंतर ते शस्त्र बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता. ज्यांनी सांभाळलंत त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली. शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा, हीच ती क्रांतीची वेळ, असं राज ठाकरे यांनी जनतेला संबोधून म्हटलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी योग्य व्यक्तीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

राज ठाकरेंकडून दसऱ्याच्या शुभेच्छा

आज दसऱ्याचा सण… साडे तीन मुहुर्तांपैकी एक…. आपण सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. दसरा म्हटलं आपण सोनं लुटणं, एकमेकांना शुभेच्छा देणं हे आपण दरवर्षी करत असतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटलं जात आहे. आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून काहीही राहत नाही. बाकी सोनं लुटून चालले आहेत. पण आमचं दुर्लक्ष… पण आम्ही सध्याच्या आयुष्यात मश्गुल… तर कधी जातीपातीमध्ये मश्गुल… आमचं याकडे लक्ष जाणार कधी? आजचा दसऱ्याचा सण खूप महत्वाचा आहे. हा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळी तुम्ही बेसावध राहून चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

ही काही प्रगती नव्हे- राज ठाकरे

महाराष्ट्राची प्रगती कोणत्या दिशेने चालली आहे सांगा… नुसते रस्ते बांधणं, पूल बांधणं, उड्डाणपूल बांधणं म्हणजे ही काय प्रगती नसते. आमच्या घरात कलर टीव्ही आला, मोबाईल आला. गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे… प्रगती ही डोक्यातून व्हावी लागते. परदेशात जेव्हा मी जातो तेव्हा लक्षात येतं की याला प्रगत देश म्हणतात. इतकी वर्षे ही लोकं तुमच्यासमोर प्रगतीच्या थापा मारत असताना देखील तुम्हाला राग येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.