मागच्या वर्षभरात दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आज ही निवडणूक होणार होती. मात्र विद्यापीठाकडून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या, त्याच भीतीपोटी महाराष्ट्राच्या निवडणुका टाळत आहेत. त्यासाठी महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. हे भेदरट, डरपोक आणि बुळचट सरकार आहे. ज्यांना निवडणुकांना सामोरे जायची भीती वाटते त्यांनी इंदिरा गांधीचा आदर्श ठेवला पाहिजे. आणीबाणीत इंदिरा गांधींनी निवडणुका घेतल्या. पराभव होणरा हे माहीत होतं तरीही त्यांनी निवडणुका टाळल्या नाही. त्यामुळे भाजप आणि मिंध्यांनी इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या चरणांचे तीर्थ प्राशन केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
सिनेटचा मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही. मतदार विकत घेतला जात नाही तिथे शिंदे, फडणवीस अजितदादा निवडणुका घ्यायला घाबरतात. ते डरपोक सरकार आहे. मुख्यमंत्री डरपोक आहेत. पैशाची ताकद ही निवडणुकीची ताकद नाही. सिनेटची निवडणूक हरतोय याची खात्री पटल्यावर निवडणूक रद्द केली. पण कोर्टाने चपराक लावली. अन् निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण विद्यापीठातील काही लोक कोर्टात जाऊन निवडणुकीला स्थगिती घेणार असल्याचं ऐकतोय. म्हणजे विद्यापीठावर दबाव आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका सुरळीत पार पडतील. आम्ही सर्व जागा जिंकू. त्यांनी मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणुका टाळल्या आहेत. तीन वर्षापासून निवडणुका नाही. मुंबई, पुण्यात महापौर नसतील तर बरं नाही. राष्ट्रपतींनी पत्र लिहिलं. पुण्यातील खड्ड्यावरून राष्ट्रपती बेजार झाल्या. पुण्याच्या आयुक्तांना पत्र लिहिलं. राष्ट्रपतींचा ताफा खड्ड्यात अडकू नये अशी भीती वाटत होती. कारण पुण्यात ट्रकच्या ट्रक खड्ड्यात गेले, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. पवारांकडे श्रीगोंदाबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो. २८८ मतदारसंघात आपली तयारी आहे. कागलला सचिन घाडगे आहेत. अनेक मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश देतात तयारी करतात. श्रीगोंद्यात काय घडतं माहीत नाही. पण महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे.