विसरलात? फार बोलायला लावू नका; संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना ‘त्या’ विधानावरून सूचक इशारा

| Updated on: Aug 11, 2024 | 10:56 AM

Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. विसरलात? फार बोलायला लावू नका; असा सूचक इशारा त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला. काय म्हणाले राऊत?

विसरलात? फार बोलायला लावू नका; संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना त्या विधानावरून सूचक इशारा
संजय राऊत, राज ठाकरे, शरद पवार
Follow us on

संजय राऊत हे शरद पवार यांच्या अमंग कार्यातील करवली आहेत. शरद पवार यांची सोंगटी आहे, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संभाजीनगर येथे केली. राज ठाकरे यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तुम्ही विसरलात? मला फार बोलायला लावू नका. तुम्ही आणि मी काय आहोत हे आपल्या दोघांनाही माहीत आहे, असा सूचक आणि गंभीर इशाराच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. जाणकार आहेत. देशाचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना भेटत असतो. पण कधीकाळी तुम्हीही शरद पवारांचे उंबरठे झिजवत होतात. विसरलात? तुम्ही शरद पवार यांच्या उंबरठ्यावर जाऊन बसत होतात. फार बोलायला लावू नका. आपण काय आहोत हे दोघांना माहीत आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका, असा गंभीर इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

तुम्ही कुठे आहात?

हे सुद्धा वाचा

करवली असेल ना. तुम्ही कुठे आहात? आम्ही कुणाच्या सुपाऱ्या तर घेत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. तेही मान्य करतील. पक्षाबरोबर निष्ठेने राहणे काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे काल संभाजीनगरमध्ये होते. त्यांचा मराठवाड्याचा दौरा काल संपला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत हे शरद पवार यांच्या अमंगल कार्यातील करवली आहेत. ते शरद पवार यांची सोंगटी आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. तसेच शरद पवार यांच्या उंबरठ्यावर बसून ते आयुष्य झिजवणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

तिघांना सुपारी

दरम्यान, संजय राऊत यांनी कालच्या मनसेच्या राड्यावरही भाष्य केलं. झालं काय? तुम्ही जे म्हणताय ना… असा एक प्रकार झाल्याचं कळलं. नंतर कळलं. काय झालं मला माहीत नाही. उद्धव ठाकरेंना माहीत नाही. ते दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचे लोकं होते. अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपारी दिल्या त्यातील ही एक सुपारी होती. राज्यातील तीन नेत्यांना अहमद शाह अब्दालीने सुपारी दिली आहे. मराठी माणसांमध्ये भांडणं लावून ते गंमत पाहत आहेत. टाळ्या वाजवत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तुम्हाला मुलंबाळं आहेत

राडा करणाऱ्यांना विनंती आहे. तुम्ही अंधारात हा प्रकार केला. मर्द असाल तर समोर या. आम्ही शिवसैनिक आहोत. माझी हात जोडून विनंती आहे, पक्षाच्यावतीने विनंती आहे. पुन्हा असं करू नका. तुम्हालाही कुटुंब आहे. घरी बायको वाट पाहतेय, मुलं वाट पाहतात, असा सूचक इशाराच त्यांनी दिला.