समृद्धी महामार्गावर 26 जणांचा बळी, संजय राऊत यांचं धक्कादायक विधान; म्हणाले, समृद्धी महामार्ग शापित

| Updated on: Jul 01, 2023 | 11:31 AM

शिवसेनेकडे कोण येतं, कोण जातं याची उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेणार आहे. गेल्या काही दिवसात काही लोक सोडून गेले. ते अचानक आले आणि अचानक गेले. ते मूळ शिवसैनिक कधी होऊ शकत नाही, असं ते म्हणाले.

समृद्धी महामार्गावर 26 जणांचा बळी, संजय राऊत यांचं धक्कादायक विधान; म्हणाले, समृद्धी महामार्ग शापित
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. या अपघातावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक विधान केलं आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचं मला वाटतं, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावर राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आज 26 लोकं मरण पावली. हे दुर्देव आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी या सरकारने मनमानी केली, त्याच्या अनेक गोष्टी बाहेर येतील. दुर्देवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही. किती वेळा श्रद्धांजली वाहायची? वेग मर्यादेबाबत आम्ही मागण्या केल्या आहेत. पण त्यावर काही होत नाही. भ्रष्टाचारातून निर्माण झालेला तो रस्ता आहे असं मला वाटतं. अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यात मला दिसत आहे. त्यामुळे हा अपघात होत नाही ना, असं वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मोर्चा निघणारच

बुलढाण्यात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याबद्दल आमच्या मनात संवेदना आहे. मृतांना आमची श्रद्धांजली आहे. पण जनतेच्या प्रश्नावर मोर्चा निघेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरे यांनी रस्ते घोटाळा आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा आवाज उठवला आहे. ज्यांच्यावर चौकशी व्हायला हवी होती असे सगळे नग भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्या पक्षात घेतले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मग चोर कोण ते कळेल

भाजपनेही आजच मोर्चाची हाक दिली आहे. तसेच चोर मचाये शोर असं म्हणत ठाकरे गटाच्या मोर्चाला हिणवलं आहे. त्यावरूनही राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजपची एक नौटंकी आहे. विशेषत: मुंबईतील भाजपची नौटकीं आहे. यांना कोणतीही दिशा नाही. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. म्हणजे शोर कोण माजवतंय आणि चोर कोण हे कळेल, असं आव्हानच त्यांनी दिलं.

बुबुळं बाहेर येतील

निवडणुका घ्यायच्या नाहीत. निवडणुकांनासमोरे जायचं नाही आणि नौटंक्या करायच्या. आमचा आजचा मोर्चा पाहून राजकीय विरोधकांच्या डोळ्याची बुबुळं बाहेर येतील. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. ज्यांना विजयाची खात्री आहे तेच हिंमत दाखवू शकतात. आमच्या सारखे जे लोक आहे, त्यांना विजयाची खात्री असल्यानेच आम्ही आव्हान देत आहे, असंही ते म्हणाले.