ठाकरे गटाच्या मोर्चा आधीच शिंदे गटाची बॅनरबाजी, ‘त्या’ तीन प्रश्नांनी कोंडी?; मातोश्रीच्या अंगणात धुमशान

| Updated on: Jun 30, 2023 | 6:50 AM

ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोठा मोर्चा आहे. मुंबई महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे या मोर्चाची संपूर्ण मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच...

ठाकरे गटाच्या मोर्चा आधीच शिंदे गटाची बॅनरबाजी, त्या तीन प्रश्नांनी कोंडी?; मातोश्रीच्या अंगणात धुमशान
shinde faction banners
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ईडीने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे. महापालिकेचे अधिकारी आणि ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी मारल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला बदनाम करण्यासाठीच ही छापेमारी सुरू केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच शिंदे गटाने वांद्रे परिसरात बॅनरबाजी करून ठाकरे गटाची पोलखोल केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे गटाने 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. त्यापूर्वी विविध समस्यांसाठी सांताक्रुझ येथील महापालिकेच्या एच पूर्व विभागावर मोर्चा काढला होता. या जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलं होतं. या मोर्चाच्या अनुषंगानेच शिंदे गटाने बॅनरमधून ठाकरे गटाला तीन प्रश्न विचारून ठाकरे गटाची कोंडी केली आहे. त्यामुळे ठाकरे गट या प्रश्नांची उत्तरे देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाच्या बॅनर्सवरील प्रश्न

बृहन्मुंबई महानगरपालिका एच पूर्व विभागावर काढण्यात आलेला जन आक्रोश मोर्चा हा अनधिकृत शाखेसाठी आणि माजी नगरसेवकाच्या अनाधिकृत बांधकामसाठी होता, संबंधित लोकप्रतिनिधींनी…

१. शिवालिक वेंचर पुनर्वसन प्रकल्प
२. सरकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीतील हक्काची घरे
३. बेहराम पाडा येथील चमडावाडी नाला प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे न मिळता आपल्याच नातलगांच्या नावावर घरे करणारे लोकप्रतिनिधी

अशा अनेक प्रश्नांसाठी कधी मोर्चाच काढला नाही, असे प्रश्न या बॅनर्समधून विचारण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात मातोश्रीच्या अंगणात बॅनर्स झळकवण्यात आले आहेत. तसेच हे बॅनर्स संपूर्ण वांद्रे विधानसभा मतदारसंघातही लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ठाकरे गटाच्या मोर्च्याच्या एक दिवस आधी शिंदे गटाने हे बॅनर्स लावून ठाकरे गटाची कोंडी केली आहे.

मोर्चा कशासाठी?

या बॅनर्समधून जन आक्रोश मोर्चा कशासाठी? असा सवालही करण्यात आला आहे. ठाकरे गटाने पाणी, रस्ते आणि नालेसफाई आदी प्रश्नांना बगल दिल्याचंही या बॅनर्समधून म्हटलं आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवर शिंदे गटाचे नाव नाही. शिंदे गटाच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. फक्त मजकूर लिहून प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच बॅनर्सच्या खाली एक बेघर नागरीक इतकच लिहिण्यात आलं आहे. मात्र, हे बॅनर्स शिंदे गटाचेच असल्याची बाब लपून राहिलेली नाही, त्यामुळे हे बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत.