महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा झंझावात, अनेक मतदारसंघात आघाडी, पण या तीन शिलेदारांना बसला दणका

| Updated on: Jun 04, 2024 | 3:54 PM

Shivsena Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ-मोठ्या घटना घडल्या. दोन पक्ष फुटले. भाजपचा दीर्घकालीन मित्र शिवसेनेची दोन शकलं झाली. तर राष्ट्रवादी दोन भागात विभागली गेली. या सर्व घडामोडीनंतर जनतेने राज्यात वेगळा कौल दिला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा झंझावात, अनेक मतदारसंघात आघाडी, पण या तीन शिलेदारांना बसला दणका
उद्धव ठाकरे
Follow us on

राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी राजकारणात त्सुनामी आली. शिवसेना उभी फुटली. तर राष्ट्रवादीची दोन शक्कलं झाली. भाजपने राज्याच्या राजकारणात मोठे डावपेच टाकल्याचा आरोप दोन्ही पक्षांतील नेत्यांनी केला. रात्रीच्या रंगलेल्या बैठकी अखेर समोर आल्या. त्या रंगवून सांगण्यात आल्या. त्यानंतर दोन वर्षांत लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली. यामध्ये आता उर्वरीत दोन्ही गटांचा सफाया होईल, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन मोठी टीका झाली. पण आज राज्यातील निकालाचे चित्र अत्यंत वेगळे आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा करिष्मा दाखवून दिला. पण यामध्ये त्यांचे तीन शिलेदार मात्र पराभवाच्या छायेत गेले.

मराठवाड्याचा बालेकिल्ला ठाकरेंच्या हातून निसटला

मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे बाजी मारतील असा सर्वांचा अंदाज होता. एक्झिट पोलने पण त्यांच्या पारड्यात मत टाकलं होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात जोरदार चुरस दिसली. चंद्रकांत खैरे यांच्या आघाडीमुळे त्यांच्या विजयाबाबत कार्यकर्ते उत्साहित होते. पण नंतर जलील आणि भुमरे यांच्यात चुरस सुरु झाली. त्यात खैरे मागे पडले. 60 हजारांचा मतांचा फरक आल्यावर चंद्रकांत खैरे यांनी मतदान केंद्र सोडले.

हे सुद्धा वाचा

सध्या 38,417 मतांनी संदीपान भुमरे हे या मतदारसंघात आघाडीवर आहेत. त्यांना 2,65,786 मते आहेत. तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 2,27,369 मते आहेत. खैरे 168,010 मते मिळाली आहेत.

ठाण्यात राजन विचारे यांची हॅट्रिक हुकणार?

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. पक्षातील उभ्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तर ठाकरे गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा जबाबदारी दिली. राजन विचारे बाजी मारतील असे वाटत असताना, म्हस्केंनी सर्वांना मोठा धक्का दिला. त्यांनी मोठी आघाडी घेतली.

सध्याच्या आकडेवारीनुसार, नरेश म्हस्के यांनी 1,44,428 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 5,32,176 मते मिळाली. तर राजन विचारे यांना 3,87,748 इतकी मते मिळलीआहेत.

अनंत गीते यांना मोठा धक्का

रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांना मैदानात उतरवले होते. यावेळी गीते विजयश्री खेचून आणतील असा विश्वास ठाकरे गटाला होता. पण गीते यांना मतदारांनी मोठा धक्का दिला. सुरुवातीलाच सुनील तटकरे यांनी मोठी झेप घेतली.

सध्याच्या आकडेवारीनुसार, सुनील तटकरे यांनी 76,945 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांनी 4,93,771 मते मिळाली आहेत. तर अनंत गीते यांना 4,16,826 मते मिळाली आहेत. या तीन मतदारसंघातील हा फेरबदल ठाकरे गटाला धक्का देणारा ठरला आहे.