Dussehra Melava 2024 Preparation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. मुंबईत होणाऱ्या या दोन्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र काल मुंबईत झालेल्या पावसामुळे दोन्हीही मैदानांवर चिखल झाला आहे. यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परतीच्या पावसाचे विघ्न निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात पार पडणार आहे. या दोन्हीही मेळाव्यातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
सध्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरु आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच शिवाजी पार्क मैदानावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. सध्या शिवाजी पार्कातील मैदानावर बॅरिकेटींग करण्यात आले आहेत. त्यासोबतच साधारण दीड ते दोन लाख शिवसैनिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात येत आहे.
मात्र काल रात्री मुंबईत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले. तसेच सध्या शिवाजी पार्क मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. त्यासोबत आज सकाळपासूनही सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर परतीच्या पावसाचे विघ्न निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आझाद मैदानातही सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. यामुळे शिंदे गटाच्या दसरा मेळावा होणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. त्यातच विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यातून काय घोषणा केली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे केंद्र, राज्य सरकारचा कसा समाचार घेतात? याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे