Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राज्यपालपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यास…’; ‘आनंदराव अडसूळांची भाजपला धमकी

| Updated on: Aug 07, 2024 | 12:11 AM

शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपला धमकी दिलीय. 8 दिवसात राज्यपालपदासंदर्भात निर्णय न घेतल्यास नवनीत राणांचं जातप्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असल्याचं अडसूळांनी म्हटलंय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राज्यपालपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यास...; आनंदराव अडसूळांची भाजपला धमकी
Follow us on

गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजप आणि नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केलाय. येत्या 8 दिवसात भाजपनं राज्यपालपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यास, नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असल्याची धमकीच अडसुळांनी दिलीय. नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र रदद् करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा गंभीर इशाराही आनंदराव अडसूळांनी दिलाय.

दरम्यान आनंदराव अडसुळांनी ज्या जातप्रमाणपत्रांवरुन नवनीत राणांना इशारा दिलाय.. ते प्रकरण काय आहे? पाहुयात. नवनीत राणांनी 2019 मध्ये अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राणांनी आनंदराव अडसुळांचा पराभव केला.. दरम्यान त्यानंतर अडसूळ यांनी राणांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता.

नवनीत राणा यांनी निवडणूक लढवण्यासाठी चुकीची जात दाखवल्याचा आरोप अडसुळांनी केला होता. त्यांनी स्वत:ची जात मोची अशी सांगितली आहे. मात्र, त्या पंजाबी चर्मकार आहेत, असा दावा अडसूळ यांनी केला होता. अडसूळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. राणांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मोची जातीचा दाखला मिळवल्याचं उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी नमूद केलं होतं. उच्च न्यायालयानं त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.. त्यानंतर राणांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकमतानं उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला होता.

पाहा व्हिडीओ:-

अमरावती लोकसभेच्या जागेवरुन आनंदराव अडसूळ त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ आणि राणां दाम्पत्यामध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं होतं.. अडसुळ कुटुंबानं अमरावतीच्या जागेवर आपला दावा सांगितला होतां. मात्र, अमित शाहांनी राज्यपालपदाचा शब्द दिल्यामुळे अमरावतीची जागा सोडल्याचं अडसुळांनी म्हटलंय.. तसंच नवनीत राणांमुळे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आनंदराव अडसुळांनी नवनीत राणांवर हल्लाबोल करत राज्यपालपदावरुन भाजपला खुली धमकीच दिलीय. त्यामुळे अडसुळांच्या धमकीनंतर भाजप कोणती पाऊलं उचलणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणारय.