Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पराभव, पर्सेन्टेंज आणि पर्सेप्शन, त्या गोष्टीमुळे फटका बसल्याचं फडणवीसांकडून मान्य

| Updated on: Jun 09, 2024 | 12:12 AM

मविआच्या खोट्या प्रचारामुळे त्यांना फायदा झाला., मात्र टक्केवारी पाहिल्यास भाजपचा मतदार कमी झाला नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय., पक्ष फोडाफोड, मराठा आरक्षणाचा वाद, मिळालेली मतं अशा अनेक मुद्दयांवर त्यांनी मतं मांडली.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पराभव, पर्सेन्टेंज आणि पर्सेप्शन, त्या गोष्टीमुळे फटका बसल्याचं फडणवीसांकडून मान्य
Follow us on

देवेंद्र फडणवीसांच्या मते विरोधकांकडून झालेला संविधान बदलाचा अपप्रचार महायुतीच्या पराभवाचं कारण ठरला. मात्र परवाच आधी भाजपच्या काही उमेदवारांनीच केलेल्या विधानांमुळे विरोधकांनी संविधान बदलाचा मुद्दा उचलल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. फडणवीसांनी दुसरा दावा केला तो मतदान टक्क्याचा त्यांच्या मते मविआला 43.9 टक्के मतं मिळाली आणि महायुतीला 43.6. दोघांच्या मतांमध्ये फक्त पाईंट 0.३ चा फरक असल्यानं फार हताश होण्याचं कारण नाही, असा त्यांचा सूर होता. हे गणित सांगताना फडणवीसांनी पॉलिटिकल अर्थमॅटिक म्हणून टर्म वापरली. मात्र जर पॉलिटिकल अर्थमॅटिकचाच विचार केला. तर देशभरात जिंकलेल्या जागांच्या तुलनेत टक्केवारीतला फरक हा कायम अल्प राहत आलाय.

उदाहरणार्थ भाजपला 2019 साली 37.30 टक्के मतं मिळून 303 खासदार मिळाले होते. यंदा त्यात फक्त 0.74 टक्क्याची घट झाली. मात्र खासदार संख्या 303 वरुन 240 वर म्हणजे 63 नं कमी झाली. 2019 ला काँग्रेसनं 19.46 टक्के मतं मिळवून 52 खासदार मिळवले. यंदा त्यात फक्त 1.73 वाढ झाल्यानं 52 वरुन खासदारसंख्या 99 वर गेली. मुळात पॉलिटिकल अर्थमॅटिक हे कोणता पक्ष किती जागा लढवतोय.

लोकसभेतली मतदारसंख्या किती, कुणाचा मतदार मतदानादिवशी जास्त बाहेर पडला किंवा नाही, यावर अवलंबून असतो. यंदा भाजपनं देशात 440 जागा लढवल्या होत्या, तर काँग्रेसनं 327. मुंबई एकूण ६ लोकसभा जागांपैकी मविआला 4 तर महायुतीला 2 जागा मिळाल्या. मात्र असं असलं तरी फडणवीसांच्या दाव्यानुसार मविआला एकूण 6 जागांवर फक्त 24 लाख तर आपल्याला 26 लाख मतं मिळाली आहेत. या वाढीव २ लाखांमध्ये 3 लाख 57 हजार 608 मतं एकट्या पियुष गोयलांना मिळालेल्या लीडची आहेत

तूर्तास याआधी आरक्षण आंदोलनाचा फटका आजवर कोणत्याही राज्यांना बसलेला नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. निकालानंतर मात्र विरोधकांच्या अपप्रचाराचा काही प्रमाणात फटका बसल्याचं फडणवीस मान्य करतायत. दरम्यान एकीकडे पक्षांच्या फोडाफोडीचाही फटका बसल्याचं एकनाथ खडसे म्हणतायत. तर फडणवीसांनी मात्र फोडाफोडीमुळे फटका बसल्याचा दावा नाकारलाय. खेळाचं मैदान असो की मग राजकारणाचं. इथं स्ट्राईक रेटपेक्षा जीत आणि हार महत्वाची असते. पण विधानसभेच्या तोंडावर फडणवीसांनी पर्सेप्शन आणि पर्सेंटेजचे आकडे ठेवून भाजप समर्थकांमध्ये उर्जा भरण्याचं काम केलंय.