देवेंद्र फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारुन अनिल देशमुखांनी त्यांच्यावरच्या आरोपांबद्दल अजून एक गौप्यस्फोट केलाय. आरोपांनुसार फडणवीसांनी देशमुखांकडे जो व्यक्ती पाठवला होता. त्याचं नाव टाईम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत देशमुखांनी जाहीर केलंय.
देशमुख म्हणाले की, काही प्रतित्रापत्र घेवून समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांनी माझ्याकडे पाठवला होता. फडणवीसांना तुमच्याशी बोलायचं म्हणून तो म्हणाला. त्यानं फडणवीसांशी माझं बोलणं करुन दिलं. त्या व्यक्तीनं सोबत आणलेल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब आणि आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप होते. त्यावर गृहमंत्री म्हणून मी स्वाक्षरी केली असती तर ते चारही नेते अडकले असते. त्यामोबदल्यात मला ईडीच्या कारवाईपासून मुक्त करण्याची ऑफर फडणवीसांची होती. मात्र खोट्या प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरीस नकार दिला. आणि तुरुंगात जाणं पसंत केलं. समित कदम जे बोलला त्याच्या साऱ्या क्लिप्स आपल्याकडे आहेत,असंही देशमुखांनी म्हटलंय
समित कदम हा व्यक्ती सांगलीतल्या मिरजचा राहणारा असून जनसुराज्य पक्षाच्या युवा प्रदेशाध्यपदाची जबाबदारी त्याच्याकडे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे भाजपसोबत महायुतीत आहेत. 4 दिवसांपूर्वी शाम मानव यांच्या आरोपांनी जेव्हा हा वाद सुरु झाला., तेव्हा देशमुखांनी खोटे आरोप करणं सुरु ठेवल्यास ते शरद पवार, ठाकरेंबद्दल काय-काय बोलले आहेत. याचे व्हिडीओ बाहेर काढण्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता. देशमुखांनी मात्र आता थेट व्यक्तीचं नाव घेत त्यांची भूमिका कायम ठेवलीय.त्यामुळे फडणवीस आता कोणते व्हिडीओ बाहेर काढणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.
पाहा व्हिडीओ;-
दुसरीकडे भाजप आमदार परिणय फुकेंनी अनिल देशमुखांचा वैद्यकीय जामीन रद्द करुन त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी केलीय., मात्र देशमुखांना वैद्यकीय कारणांसाठी नव्हे तर आरोपांत तथ्य नव्हतं म्हणून जामीन मिळाला आहे. आरोपांआधी जामीन ऑर्डर बघून घ्यावी, असा सल्ला अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी भाजपला दिलाय.
देशमुखांवर भाजपनं १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता.परमबीर सिंहांच्या आरोपांवरुन याची सुरुवात झाली, ईडीनं देशमुखांना अटक केली. यात पोलीस अधिकारी सचिन वाझेही आरोपी होते. पुढे वाझेच या केसमध्ये माफीचे साक्षीदार बनले. मात्र कोर्टानं स्वतः साक्षीदारच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्यानं त्याच्या आरोपांना किती विश्वासार्ह मानायचं म्हणून कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं. त्यात चौकशीवेळी परमबीर सिंहांनी चांदिवाल आयोगापुढे आपण हे आरोप ऐकीव माहितीवर केले असून कोणतेही पुरावे नसल्याची साक्ष दिली. शिवाय आरोप 100 कोटीचे झालेले असताना प्रत्यक्षात ईडीनं चार्जशीट फाईल केली तेव्हा त्यात 4 कोटी 70 लाखांचा उल्लेख होता. मात्र भाजप नेते त्याच केसचा उल्लेख 100 कोटी वसुली म्हणून करतात.
दरम्यान खोट्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करुन स्वतःची सुटका करुन घ्या, अशी ऑफर असल्याचा दावा देशमुखांनी याआधीही केला होता. मात्र त्या आरोपांचा अंनिसचे शाम मानवांनी पुनरुच्चार केल्यानंतर हा वाद पुन्हा सुरु झालाय.