शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार यांना सोबत घेत सत्ता स्थापन करण्यावरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. आपल्या भाषणात बोलताना ठाकरे म्हणाले तर मग मी आतंकवादी आहे, ते असं का म्हणाले जाणून घ्या.
काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला. मिंधे बोलले शहरी नक्षलवाद. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो.लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. संविधान वाचवणं हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता. दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का? हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांच्याशी झालेली युती नैसर्गिक आहे का. मी म्हणतो भाजपमुक्त राम पाहिजे. तो मिळाला. नितीश कुमार म्हणाले होते, संघ मुक्त भारत. त्यांच्यासोबत मानाचं पान घेऊन बसले होते. मोदी चंद्राबाबूंना यूटर्न बाबू म्हणाले होते. चंद्राबाबू म्हणाले होते मोदींना अतिरेकी. मांझी म्हणाले होते राम काल्पनिक आहे. त्यांच्यासोबत हे बसले. अशा लोकांना घेऊन तुम्ही मला हिंदुत्व शिकवत आहात, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.