“आमचा तात्विक वाद संपला” ; नारायण राणे यांच्यासाठी जुना साथीदार आला धाऊन…

| Updated on: Jan 16, 2023 | 8:52 PM

नारायण राणे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा माझा वैयक्तिक वाद नाही. राजकीय वाद हे तात्पुरते असतात, आणि आमच्यातील वाद हे मिटलेले आहेत. त्यामुळे आता आमचा जिल्हा शांत आहे.

आमचा तात्विक वाद संपला ; नारायण राणे यांच्यासाठी जुना साथीदार आला धाऊन...
Follow us on

मुंबईः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरकर आणि राणे वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा नाही. नारायण राणे आणि राणे पुत्रांकडून सध्या मंत्री असलेले मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सातत्याने पातळी सोडून टीका करण्यात आली आहे. त्यांना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडूनही केसरकर स्टाईलने वेळोवेळी त्यांना उत्तर देण्यात आली आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनीही शिंदे गटात सामील होत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले.

त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने राज्यात युतीचे घोषणा करत अंतर्गत वादाला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला होता.

शिंदे-फडणवीस सरकार राज्यात असतानाच आता केसरकर आणि राणे या कोकणातील नेत्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

एकीकडे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणातून लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी असं जाहीर आव्हान केले आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यासोबत माझा तात्विक वाद होता आणि तो त्या त्या वेळी बोलून मिठवलेला आहे.

त्यामुळे आता जर नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तर नारायण राणेंचा प्रचार मी स्वतः करणार, आणि निवडून आणणार असा विश्वास देत नारायण राणे आणि आमचा वाद संपला असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

मंत्री दीपक केसरकर यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भविष्यात जर कोकणातून उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का असा सवाल करण्यात आला होता.

त्यानंतर दीपक केसरकर यांनी आपले वाद हे वैयक्तिक नव्हते तर ते तात्विक वाद होते, त्यामुळे त्यांना जर उमेदवारी मिळाली आणि भाजप आणि आमची युती असेल तर त्यांच्यासाठी मी प्रचार करणार आणि त्यांना निवडून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राणे आणि केसरकर यांच्या वादाविषयी बोलताना केसरकर यांनी आपण राजकीय भूमिकेसाठी आणि कोकणच्या विकासासाठी मी त्यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा माझा वैयक्तिक वाद नाही. राजकीय वाद हे तात्पुरते असतात, आणि आमच्यातील वाद हे मिटलेले आहेत. त्यामुळे आता आमचा जिल्हा शांत आहे.

तसेच भाजप आणि शिंदे गटाची युती भक्कम असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांना भाजपकडून जर उमेदवारी मिळत असेल तर भाजपचा उमेदवार म्हणून मी त्यांचा प्रचार करणार आहे.

आणि त्यांच्या मंत्री पदामुळे कोकणाचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी तिकडे अधिक लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.