मुंबई : एकेकाळची मुंबईचा ‘मवाली’ ही ओळख पुसून काढत आता मुंबईचा ‘इमानदार’ अशी नवी ओळख निर्माण करण्यास मुंबईकरांना यश आलंय. जगभरातील 16 देशाच्या प्रमुख शहरांमध्ये ‘प्रामाणिक’ आणि ‘इमानदार’ शहर कोणते याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये मुंबईचा दुसरा क्रमांक आला. मुंबईकरांना आनंद आणि अभिमान वाटावा अशी ही ‘सन्मानजनक’ गोष्ट. यामुळे जगभरातील शहरापेक्षा मुंबई ही ‘इमानदार’ लोकांची यावर शिक्कामोर्तब झाले. शिवाय मुंबईवर असणाऱ्या नागरिकांच्या विश्वासात आणखी भर पडली आहे.
रीडर्स डायजेस्ट’ने जगातल्या कोणत्या शहरातील लोक सर्वात जास्त इमानदार आहेत याचा आढावा घेण्यासाठी जगातील प्रमुख अशा शहरांची निवड केली. यात भारताची आर्थिक राजधानी मुंबईचाही समावेश केला. यात मुंबई नंबर ‘टू’ ठरली.
यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. यामागे जगातील कोणत्या शहरातील लोकांची विचारसरणी आणि मानसिकता कशी आहे ? ते शहर सर्वात प्रामाणिक आहे का ? हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी The Wallet Experiment नावाची मोहीम सुरू केली होती.
रीडर्स डायजेस्टने जगातील 16 मोठा शहरांमध्ये एकूण 192 वॉलेट ठेवले. 16 शहरांमधील निरनिराळया अशा 12 ठिकाणी त्यांनी ही वॉलेट ठेवली. या वॉलेटमध्ये एका व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, परिवाराचा फोटो, कुपन, बिजनेस कार्ड आणि स्थानिक मुद्रांच्या स्वरूपात 50 डॉलर इतकी रक्कमही ठेवली होती. भारतात ही रक्कम सुमारे 3 हजार 500 रुपये इतकी होती.
जाणूनबुजून ठेवण्यात आलेली ही वॉलेट परत येतात का याची काही महिने त्यांनी वाट पाहिली. त्यानंतर जेव्हा किती पाकिटे परत आली याचा आढावा घेण्यात आला तेव्हा प्रामाणिक मुंबईकरांनी 12 पैकी 9 वॉलेट सुरक्षितरित्या पुन्हा परत केल्याचे आढळून आले.
फिनलंडच्या हेलसिंकी शहरामधील नागरिकांनी 12 पैकी 11 वॉलेट परत केले होते. त्यामुळे सर्वात इमानदार शहरांच्या यादीत त्याचे नाव सामावले गेले. मुंबई पाठोपाठ न्यूयॉर्क आणि बुडापेस्ट ही शहरे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आली. येथील नागरिकांनी 12 पैकी 8 वॉलेट परत केली.
मास्को, एम्सटडर्ममध्ये 12 पैकी 7 वॉलेट, बर्लिन, ल्युबियानामध्ये 12 पैकी 6 वॉलेट, लंडन, वर्साय मध्ये 5 वॉलेट तर पोर्तुगालच्या लेस्बिनमध्ये फक्त 1 वॉलेट परत करण्यात आले. विशेष म्हणजे 2021 साली झालेल्या या सर्वेक्षणाची आजही मुंबईकरांना आठवण होत आहे.