नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. औरंगजेबच्या कबरीवरून आता वाद चांगलाच पेटला आहे. नागपुरात दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून राडा झाला आहे. दोन गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. वाद टोकाला पोहोचला आणि दोन्ही गटामध्ये दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं, आहे, दरम्यान या घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुख:त सहभागी होणारे शहर आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आणि प्रशासनाला सहकार्य करा, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात चांगलाच वाद पेटला आहे. दोन गट आमने-सामने आले. नागपुरच्या महाल परिसरात जोरदार राडा झाला. काही कळायच्या आतच दगडफेक सुरू करण्यात आली, या घटनेत पोलीस जखमी झाले आहेत. वाहनांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा देखील करण्यात आला. मात्र जमाव अधिकच आक्रमक झाल्यानं जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केलं आहे. लोकांनी पोलिसांना सहकार्य करावं, प्रशासन परिस्थिती हाताळत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. या परिसरात सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.