संजय राऊत आणि भाजपच्या ट्विटर वॉरवर काँग्रेसची एका वाक्यात प्रतिक्रिया; विजय वडेट्टीवार म्हणाले…

| Updated on: Nov 21, 2023 | 8:53 AM

Vijay Wadettiwar on Sanjay Raut Chandrashekhar Bawankule : खासदार संजय राऊत, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेले आरोप आणि भाजपच्या ट्विटर वॉरवर विजय वडेट्टीवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत? वाचा सविस्तर...

संजय राऊत आणि भाजपच्या ट्विटर वॉरवर काँग्रेसची एका वाक्यात प्रतिक्रिया; विजय वडेट्टीवार म्हणाले...
vijay wadettiwar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 21 नोव्हेंबर 2023 : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला. या ट्विटमधून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जुगार खेळण्याचा ठपका ठेवला. या सगळ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत आरोप फेटाळले. भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. संजय राऊत यांचा ‘ब्रँड’ शोधून काढला पाहिजे, असं ट्विट भाजपच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं. भाजप आणि संजय राऊत यांच्यात सुरु झालेल्या या ट्विटर वॉरवर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या सगळ्यात पडायचं नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

संजय राऊत यांचं ट्विट काय?

महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है… 19 नोव्हेंबर मध्यरात्री. मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?,ते म्हणे..फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?, असं म्हणत संजय राऊत यांची टीकास्त्र डागलं.

भाजपचं उत्तर काय?

संजू भाऊचा सकाळी 9 वाजताच्या भोंग्यापूर्वीचा ‘ब्रँड’ तर संपूर्ण महाराष्ट्राला आता कळून चुकला आहे.पण, आज दुपारच्या वायफळ बडबडीपूर्वीचा ब्रँड आता शोधूनच काढावा लागेल. बंदा ये संजय राऊत कौनसा नशा करता है…?, असं म्हणत भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.

जालन्यातील लाठीचार्जवर वडेट्टीवार म्हणाले…

जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो लाठीचार्ज कोणी केला हे जरांगे पाटील बघतील किंवा सरकार बघेल. पण तो लाठीचार्ज दुर्दैवी होता. अशी घटना सरकार टाळू शकलं असतं. हे सरकारचं अपयश आहे. अनेक महिलांवर लाठीचार्ज झाला. पोलिसही मोठ्या प्रमाणात जखमी झाले. या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे, निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी आम्ही अधिवेशनात करू, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

सरकारवर आरोप

बोनस द्यावा, ही मागणी अनेकांची आहे, धान निघालं असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं धान हे व्यापाऱ्याला विकलेले आहे. संपूर्ण धान व्यापाऱ्यांनी उचलल्यावर सरकार बोनस देण्याची घोषणा करणार आहे का? सरकारला आता ही घोषणा करता आली असती. मात्र केवळ वेळ काढू पणा सरकार करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.