मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेडमध्ये आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडच्या सभेला सुरूवात केली. मनोज जरांगे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी ‘पाटील- पाटील’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. ढगाळ वातावरण, रिमझिम पावसात मनोज जरांगे पाटील यांनी सभेला संबोधित केलं. आपल्या विरोधात जे जातील त्यांना पाडा. मग ते महाविकास आघाडीचे असो की महायुतीचे असो… पाडायचे म्हणजे पाडायचे, असं मनोज जरांगेंनी नांदेडच्या सभेत म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलंय.
माझी एकच शेवटची इच्छा आहे की, करोडो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. एक एक रुपया जमा करून मराठा लेकरं शिकवत आहेत. ऊसतोड केली, रोजाला जात आहेत. सावकाराच्या घशात गेले पण लेकराला कधी कमी पडला नाही. पण या आरक्षणाने मराठवाड्याचा घात केला. मराठ्यांनी ठरवले आता काय झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. जो कोणी मराठा अधिकारी आहे त्याला धमकावलं जातं. समाजाने आपल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे शिका, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
मराठ्यांनी काहींना पाडले पण जे आमच्या मतांवर निवडून आले. त्यांनी आमच्या बाजूने बोला… आमच्या बाजूने उभे नाही राहिले तर मात्र तुम्हाला पण पाडणार आहोत. निवडून आलो आता पाच वर्षे बिनधास्त झालो असं म्हणू नका. एवढ्यावेळेस मी शंभूराजे देसाई यांच्यावर विश्वास ठेवलाय. आता दगफटका करू नका. आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा सर्व मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. जर तसे झाले नाही तर मात्र मराठे मुबंईला आलोच म्हणून समजा. एकदा का मुंबईत आलो की परत माघार नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
मी 6 कोटी मराठ्यांच्या अपेक्षाभंग होऊ देणार नाही. तुमच्यासाठी मी सरकारच्या नरड्यावर पाय ठेवतो. पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या. – तुम्ही आमचे शेकडो लोक पाडले, आम्ही तुमचा एक पडला तर तुम्हाला किती वाईट वाटले. छगन भुजबळ तुम्ही फुकटच, बोगस खाता आणि आम्हाला विरोध करता. छगन भुजबळ काय त्याच्या शंभर पिढ्या आल्या तरी मागे हटायचं नाही, असंही मनोज जरांगे यांनी या सभेत म्हटलं आहे.