शिर्डी साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असुन देश विदेशातील हजारो भाविक या पायी परिक्रमेत सहभागी झाले आहेत. महिला भाविकांची संख्या देखील अत्यंत जास्त होती. 14 किलोमीटर असलेली ही परिक्रमा खास ठरली.
शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे, ढोल - ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासुन सकाळी 6 वाजता परिक्रमेस सुरूवात झाली होती.
साईबाबा हयातीत असताना शिर्डी गावच्या शिवेची परिक्रमा करत होते असा उल्लेख साईबाबांच्या जिवनावर आधारीत साईसतचरित्र ग्रंथात आढळतो. त्या धर्तीवर तीन वर्षापूर्वी साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला.
कोरोनामुळे या उत्सवात खंड पडला होता. सर्व नियम शिथील झाल्यानंतर आज निघालेल्या शिर्डी परिक्रमेत पाच हजारांहून अधिक भाविक सामिल झाले आहेत.
ग्रामस्थच नव्हे तर शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच राज्य आणि विदेशातून आलेले भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, विश्वस्त मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनी विखे पाटील यांचे हस्ते साईबाबांची आरती झाली.
ज्या मार्गावरून परिक्रमा जाणार त्या मार्गावर रांगोळी तसेच फुलांचे आच्छादन करण्यात आले. भाविक मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते.