शुभमंगल खरोखरच सावधान ! 8 महिन्यात 9 तरुणांशी विवाह; लग्नाळूंची झोप उडवणारी सिमरन अखेर जेरबंद

| Updated on: Jul 10, 2024 | 5:29 PM

लग्नाचं अमिष दाखवून विवाह करू इच्छिणाऱ्या तरुणांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी तर अशा टोळ्याच सक्रिय आहेत. अत्यंत गोड बोलून लग्न उरकून घ्यायचं, लग्नासाठीचे पैसे घ्यायचे आणि पोबारा करायचा असा धंदा हे लोक करत असतात. नगरमध्येही अशा टोळक्याचा भांडाफोड झाला आहे.

शुभमंगल खरोखरच सावधान ! 8 महिन्यात 9 तरुणांशी विवाह; लग्नाळूंची झोप उडवणारी सिमरन अखेर जेरबंद
Gang looting
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

तुम्ही लग्नाळू असाल आणि वधू शोधत असाल तर ही बातमी वाचून मगच पुढचं पाऊल टाका. नाही तर सातफेरे तर घ्याल, मग नंतर घेरी आल्या वाचून राहणार नाही. कारणही तसंच घडलंय. लग्नाळू तरुणांशी लग्न करून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केलीय. नगरमध्येच ही घटना घडलीय. सिमरन नावाची तरुणी हा कारनामा करायची. तिने आठ महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 9 तरुणांशी विवाह केला. तिची चौकशी केल्यानंतर जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा सर्वांचीच झोप उडाली.

लग्नाळू तरुण हेरून फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केलंय. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून 2 लाख 15 हजार रुपये घेत त्याचे सिमरन गौतम पाटील हिच्याशी लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाच्या दोन दिवसांनंतरच नवरीने तिच्या साथीदारासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिमरनसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने 8 महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

आणखी दोघे शिकार होता होता वाचले

पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना गजाआड केले आहे. शाहरुख शेख फरीद, दीपक पांडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील, सचिन बलदेव राठोड ऊर्फ राज रामराव राठोड आणि युवराज जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद, मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली.

या टोळीने आणखी दोन तरुणांना फसविण्याचा कट रचला होता. मात्र, त्या आधीच मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना अटक केली. या प्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने 28 जून रोजी फिर्याद दिली होती. पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण 13 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने या आरोपींना 11 दिवसांची कोठडी दिली आहे.

डोळ्यात मिरचीपूड फेकली

लग्न झाल्यानंतर दोन दिवसातच सिमरनने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सासूने सिमरनला पकडून ठेवले. त्यामुळे सिमरनने सासूच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तिच्या साथीदारानेही या महिलेला मारहाण करून पोबारा केला.