“लोकसभेला आमच्याकडे सांगायला काहीही नव्हतं, पण आता…”, रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

| Updated on: Sep 20, 2024 | 11:47 AM

"आता महिला अत्याचाराच्या घटनांचा संबंध लाडकी बहीण योजनेसोबत जोडून विरोधक त्याला वेगळं वळण देण्याचे प्रयत्न करत आहेत", असा घणाघातही रुपाली चाकणकर यांनी केला.

लोकसभेला आमच्याकडे सांगायला काहीही नव्हतं, पण आता..., रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
रूपाली चाकणकर
Image Credit source: Facebook
Follow us on

Rupali Chakankar On Maharashtra Vidhansabha : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी लोकसभा पराभवाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचेही कौतुक केले.

रूपाली चाकणकर या गेल्या काही दिवसांपासून जळगावात आहेत. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा जळगावात मेळावा पार पडत आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात असेल किंवा राज्यात असेल महायुतीसाठी अतिशय उत्तम वातावरण आहे. कारण यापूर्वी आम्ही जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जात होतो, तेव्हा जनतेपर्यंत किंवा महिलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे काही योजना नव्हत्या. आम्ही काही उपक्रम राबवतो, हे सांगण्यासारखंही आमच्याकडे फारसं काही नव्हतं. पण आता राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना राबवणारे महाराष्ट्रातील महायुती सरकार पहिलं सरकार आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असे रुपाली चाकणकरांनी म्हटले.

“विरोधक त्याला वेगळं वळण देण्याचे प्रयत्न करतात”

महिलांना महायुती सरकारवर विश्वास आहे. या सगळ्यांनी एकत्रित सरकारला पाठिंबा दिला आहे आणि हे सरकार पुढे पाच वर्ष अखंडित राहावं हा विश्वास देखील त्या व्यक्त करताना दिसत आहेत. लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा योजना या सगळ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पडसाद महिलांमध्ये उमटताना दिसत आहेत. एकंदर जळगावमध्ये महायुतीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. यापूर्वी संजय गांधी निराधार योजना आणली होती, मात्र कुठल्याही महिला अत्याचाराची घटना घडली तर तिचा संबंध त्या योजनेची जोडला नाही. मात्र आता महिला अत्याचाराच्या घटनांचा संबंध लाडकी बहीण योजनेसोबत जोडून विरोधक त्याला वेगळं वळण देण्याचे प्रयत्न करत आहेत, असा घणाघातही रुपाली चाकणकर यांनी केला.

“महाराष्ट्रातली जनता सुज्ञ”

“महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. भगिनी सुज्ञ आहेत. केवळ लाडकी पण नाही तर शेतकरी असतील रोजगार असतील मुलींना मोफत शिक्षण असेल. वयोश्री योजना असेल. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणली आहे. विरोधकांच्या टीका पाहिल्या तर आपल्याला कळेल की त्यांना किती नैराश्य आलं आहे. आता विरोधकांना प्रश्न पडला आहे की विधानसभेला समोर जाताना आपण लोकांसमोर काय घेऊन जावं? त्यांना सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे त्यांना टीका करणे हे एकमेव माध्यम उरला आहे”, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना बंद करायची, महिलांच्या खात्यात पैसे पडू द्यायचे नाही यासाठी अक्षरशः विरोधक सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे महिलांना कोण विरोध करत आहे, कोण आपल्या योजनेमध्ये आडकाठी आणत आहे, हे कळत आहे. या विधानसभेमध्ये महिला त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. त्यामुळे विरोधकांनी किती टीका केली तर विधानसभेमध्ये आपलं चित्र स्पष्ट होईल, असेही रुपाली चाकणकरांनी म्हटले.