मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवरात्र उत्सवाला सुरूवात होतो, घटस्थापनेच्या दिवशी काल हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा निर्णय केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने राज्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा केला
माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार या विषयावर मनमोकळपणे बोलले. ‘ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी साहित्याच्या क्षेत्रातील सर्वांनी केली. साहित्य परिषदेमध्ये,अधिवेशनामध्ये ठराव करून तेथेही करण्यात आली होती. माझ्यासारखे अनेक सहकारी , ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आस्था आहे, आम्हीसुद्धा व्यक्तीगत पातळीवर केंद्र सरकारकडे मागणी करत यासंदर्भात आग्रह केला, पाठपुराव केला होता ‘, असे ते म्हणाले.
‘केंद्र सरकारने मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाषेचं महत्व वाढण्यासाठी या निर्णयाचा अतिशय उपयोग होणार आहे. यापूर्वी मराठी भाषेत जे काही लिखाण झालं आहे, पण जे फारसं लोकांच्या नजरेसमोर आलेलं नाही, ते लोकांसमोर आणण्यासाठीचा मार्ग ( मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाने) यामुळे खुला झाला. याशिवाय, नवीन पिढी काही लिहू पहात असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंबंधीची तरतूद त्यामध्ये आहे, त्याचाही लोकांना लाभ होईल’, असे शरद पवार म्हणाले.
निर्णयाला उशीर झाला पण
‘मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा हा जो निर्णय आहे, त्याला खरंतर उशीर झाला पण तरीही तो निर्णय झाला याचा आनंद आहे, त्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो’ , असा टोलाही पवार यांनी लगावला.
मराठी शाळांची संख्या कमी होत आहे
एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झालेला असताना दुसरीकडे मात्र मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या मुद्यावरून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘ ही तक्रार अनेक ठिकाणी दिसते. मराठी शाळांची संख्या कमी होत आहे.आणि शाळेत मराठी भाषा शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा कमी होत आहे, असं चित्र दिसतंय. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची ही स्थिती आहे. असंच चालू राहिल तर शाळा बंद होतील, शिक्षकांच्या नोकरीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. या प्रश्नात राज्य सरकारला लक्ष घालावंच लागेल. (मराठी शाळेत जाणाऱ्या) मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे. त्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल,’ असं शरद पवार म्हणाले.