अजितदादा मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच, दिल्लीतून सूत्र… कुणी केला हा दावा?

| Updated on: Apr 27, 2023 | 11:58 AM

राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. दोघेही सोयीचं आणि चमकोगिरीचं राजकारण करत असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे.

अजितदादा मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच, दिल्लीतून सूत्र... कुणी केला हा दावा?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच आता अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. धाराशीव, नागपूर आणि मुंबईत अजितदादांचे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री असं लिहिलं आहे. त्यामुळे अजितदादा खरोखरच मुख्यमंत्री होणार का? कसे होणार? या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत. दिल्लीतून हालचाली सुरू आहेत म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

YouTube video player

अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना आहे. माझीही तीच भावना आहे. राज्य व्हावे ही श्रीची इच्छा असं तत्कालीन जनतेला वाटत होतं. आपण बखरीत वाचलं. आता तो काळ राहिला नाही. पण लोकशाहीत एकंदरीत प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा ही प्रत्येकाची भावना आहे. भूमिका आहे. माझीही तीच भावना आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अमित शाह यांचीही कबुली

धाराशीव आणि नागपूरमध्ये बॅनर्स लागले आहेत. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले होते. फडणवीस यांनी बॅनर्स हटवण्याचा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. अजितदादा हेच महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. तेच भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करतील. याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही. ते करावं. कारण महाराष्ट्राचं राजकारण सांभाळेल असा अजितदादांसारखा तोलामोलाचा नेता महाराष्ट्रात नाही. हे दस्तुरखुद्द अमित शाह यांनी कबुल केलं आहे, असं ते म्हणाले.

वेट अँड वॉच

अजित दादा मुख्यमंत्री होणार आहेत. वेट अँड वॉच. दिल्लीतून सूत्र हलत आहेत. एकनाथ शिंदे हे सक्तीच्या रजेवर गेलेत. त्याचा याच्याशी संबंध लावू नका. महाविकास आघाडीचं सरकार येणार. अजितदादा पवार हेच मुख्यमंत्री होणार आहेत, असंही ते म्हणाले.

चमकोगिरीचं राजकारण

यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांवरही टीका केली. एकीकडे हनुमान चालिसाच्या नावाने राजकारण करायचं दुसरीकडे पत्रकारांनी विचारलं तुम्हाला हनुमान चालिसा येतो का? तर उत्तर द्यायचं नाही. हनुमानाचा जन्म कुठे झाला विचारलं तर नवनीत राणा यांना सांगता येत नाही. त्या म्हणाल्या मध्यप्रदेशात. तर योगी आदित्यनाथ म्हणतात कर्नाटकात.

उद्या गुजरातच्या निवडणुका आल्या तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे गुजरातमध्ये जन्माला आल्याचं सांगतील. हे बेताल विधान करत आहेत. पठाणमधील भगव्याला विरोध करायचा आणि त्या स्वत: सिनेमात भगवे कपडे वापरायचे. त्यांनी भगव्या रंगाचा दुरुपयोग केला आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून असं रवी राणाचं राजकारण आहे. राणा दाम्पत्य सोयीचं आणि चमकोगिरी करणारं राजकारण करत आहेत. दोघांपैकी एकही निवडून येणार नाही. त्यांना फार मोठा विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं.