बिच्चारे अजितदादा… 60 जागांवर आले, हा तर चुकलेल्या निर्णयाचा भोग; विरोधी पक्ष नेत्याची खरमरीत टीका

| Updated on: Aug 31, 2024 | 8:52 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाने चांगलीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत 80 जागा लढवण्याची घोषणा अजितदादा गटाने केली होती. पण आता हा आकडा 60 वर आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून अजितदादा गटाला मात्र चांगलेच टोले लगावले आहेत.

बिच्चारे अजितदादा... 60 जागांवर आले, हा तर चुकलेल्या निर्णयाचा भोग; विरोधी पक्ष नेत्याची खरमरीत टीका
ajitdada pawar
Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी विधानसभेच्या 60 जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीने आधी विधानसभेच्या 80 जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं. पण अचानक आता हा आकडाने 20 ने कमी झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांची खिल्ली उडवली आहे. बिच्चारे अजितदादा. 60 जागांवर आले. आमच्याकडे असते तर सव्वाशे जागा लढवल्या असत्या. काय करणार? हा तर चुकलेल्या निर्णयाचा भोग आहे, अशी खरमरीत टीकाच विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अजितदादा 60 वर आले. पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता दिसते. कदाचित 60 जागा मागाव्यात आणि जे दिले ते पदरात पाडून घ्यावे, बिच्चाऱ्या अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो. आम्हाला कीव येते. अजितदादा राष्ट्रवादीसोबत असते आणि आमच्यासोबत आघाडी असती तर 125 जागा लढल्या असत्या. आज त्यांना 60 वर आणलंय. हा चुकलेल्या निर्णयाचा भोग असावा असं मला वाटतं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हिस्सेदार वाढले तर…

विधानसभेत भाजप जितक्या जास्त जागा लढेल तेव्हढा जास्त फायदा काँग्रेसला होणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला एक जागा मिळाली, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पोट शूळ उठला आहे. भाजप आणि शिंदे गटाला हिस्सेदार वाढवायचे नाहीये. पुन्हा सत्ता आली तर हिस्सेदार वाढतील. त्यामुळेच ते अजितदादांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नागपुरात उधळपट्टी

राज्य सरकारचं सरकारी तिजोरीची उधळपट्टी करणं सुरू आहे. नागपुरात आज लाडकी बहीण कार्यक्रम आहे. त्याठीकाणी कॅम्प आहे. एका इव्हेंटसाठी चार कोटीचा खर्च करण्यात आला आहे. नागपुरात जानेवारीपासून 524 अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यावर थातूरमातूर कारवाया सुरू आहेत. 2837 केसेस 1 जानेवारी ते 1 ॲागस्टपर्यंत झाल्या आहेत. त्याची लाज या सरकारला नाही. महिलांवरील अत्याचार रोखण्यात ये सरकार अपयशी ठरलंय अन् इकडे अशा इव्हेंटवर खर्च केला जात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.