“18 व्यवसाय, 20 लाखांहून अधिक लोक आणि…” विश्वकर्मा योजनेची व्याप्ती किती मोठी? पंतप्रधान मोदींनी आलेखच मांडला

| Updated on: Sep 20, 2024 | 1:54 PM

यानिमित्ताने वर्ध्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी या योजनेची व्यापती किती झाली आहे, याबद्दल भाष्य केले.

18 व्यवसाय, 20 लाखांहून अधिक लोक आणि... विश्वकर्मा योजनेची व्याप्ती किती मोठी? पंतप्रधान मोदींनी आलेखच मांडला
Follow us on

PM Narendra Modi on Vishwakarma Yojana : सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ मिळावं आणि गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही योजना सुरु करुन एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने वर्ध्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी या योजनेची व्यापती किती झाली आहे, याबद्दल भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्धामध्ये आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण केले. तसेच त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही योजना कशा पद्धतीने सुरु आहे, याबद्दलची माहिती दिली.

महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण

“विश्वकर्मा जनतेच्या जीवनात समृद्धी आणणं हे आमचं लक्ष्य आहे. या योजनेसाठी वेगवेगळे विभाग एकजूट झाले आहेत. हे अभूतपूर्व आहे. देशातील ७०० हून अधिक जिल्हे, देशातील २५० लाख ग्रामपंचायती हे सर्व या मोहिमेला गती देत आहेत. या एका वर्षात १८ वेगवेगळ्या व्यवसायतील २० लाखाहून अधिक लोकांना याच्याशी जोडलं गेलं. वर्षभरात ८ लाख कारागिरांना ट्रेनिंग दिली आहे. एकट्या महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे.

साडे सहा लाख कारागिरांना आधुनिक साधनं दिली आहे. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली आहे. प्रत्येक लाभार्थीला १५ हजार रुपयांचं ई व्हाऊचर दिलं जात आहे. कोणत्याही गॅरंटी शिवाय तीन लाखाचं कर्ज दिलं जात आहे. एक वर्षातच विश्मकर्मा भावा बहिणांना १४०० कोटीचं लोन दिलं आहे. प्रत्येक गोष्टीचं या योजनेतून ध्यान दिलं जात आहे. त्यामुळेच ही योजना यशस्वी होत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार विश्वकर्मा योजनाचे सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसी समाज घेत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा फायदा गरजू गरिबांना चांगल्या पद्धतीने झाला आहे. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.