लाडकी बहीण योजना बंद; अजित पवार गटातील मंत्री म्हणाले, आचारसंहितेच्या नावाखाली…

| Updated on: Oct 20, 2024 | 11:29 AM

Ladki Bahin Yojana and Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा ठरलेल्या 'लाडकी बहीण' योजनेवर शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

लाडकी बहीण योजना बंद; अजित पवार गटातील मंत्री म्हणाले, आचारसंहितेच्या नावाखाली...
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Image Credit source: Facebook
Follow us on

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे शिंदे सरकारने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण योजना’… ही योजना महिला मतदारांवर थेट प्रभाव टाकणारी आहे. याच कारणामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ही योजना थांबवण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाने ही योजना तुर्तास थांबवली आहे. शिंदे सरकारकडून महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच देण्यात आलेत. त्यामुळे आता निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यात या योजनेचं भवितव्य काय असेल? हे कळणार आहे. यावर शिंदे सरकारमधील अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने लाडकी बहिण योजनेला स्थगिती दिल्याचं समजतं आहे. या मुद्द्यावर विरोधक तुम्हाला फसवायचे काम करतील. लाडकी बहीण योजना जुलै महीन्यात सुरु झाली. योजनेचा आता चौथा महिना चालू आहे. चार महिन्याचे 6000 रूपये मिळायला हवे होते. पण आमच्या भगिनींना 7500 रूपये मिळालेत. हे जास्तीचे 1500 रूपये तुम्हाला पुढच्या महिन्याचे दिलेले आहेत, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

सरकारला हे माहीत होते की निवडणूक आयोग निवडणुक काळात आचारसंहितेच्या नावाखाली या योजनेला बंदी घालेल. त्यामुळे आम्ही आगोदरच मंत्री मंडळात निर्णय घेऊन एक महिन्याचे आगाऊ पैसे दिले आहेत. निवडणुक झाली की पुन्हा ते पैसे तुम्हाला मिळतं राहतील. त्यामुळे कोणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करील तो प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, असं दिलीप वळसे पाटील म्हणालेत.

छगन भुजबळ काय म्हणाले?

मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, असे फार थोडेसे लोक राहिले आहेत. सगळ्यांचे पैसे अकाउंट मध्ये गेलेले आहेत. 98 टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना मिळाले आहेत. ही आमची कायम स्वरूपी योजना आहे. निवडणुकीसाठी आणलेली ही योजना नाही. त्यामुळे याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे, असं भुजबळ म्हणाले.