अजितदादांच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली, हसन मुश्रीफ आणि भुजबळ आमने सामने; कारण काय?

| Updated on: May 31, 2024 | 12:12 PM

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे दोन नेते आमनेसामने आले आहेत. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याला निमित्त जितेंद्र आव्हाड हे ठरले आहेत. भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केल्याने मुश्रीफ यांनी भुजबळ यांना खडेबोल सुनावले आहेत.

अजितदादांच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली, हसन मुश्रीफ आणि भुजबळ आमने सामने; कारण काय?
Hasan Mushrif
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर एकच वादळ उठलं आहे. मनुस्मृती दहन करताना आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे भाजपने आव्हाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करून संताप व्यक्त केला आहे. मात्र असं असतानाच महायुतीतील मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे आव्हाड यांच्या मदतीला धावून आले आहेत. भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केली आहे. भुजबळ यांनी आव्हाड याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली आहे. या निमित्ताने आता मुश्रीफ आणि भुजबळ यांच्यातच जुंपली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पत्रक फाडलं हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देण्याचं विधान भुजबळ यांनी केलं हे अत्यंत दुर्देवी आहे. भुजबळांनी आव्हाड यांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवं होतं, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांचा समाचार घेतला आहे.

राज्यसभेचं माहीत नाही

छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरही मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबतची माझ्याकडे काहीच माहिती नाही. या संदर्भात आमचे नेते अजित पवारच सांगू शकतील, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

आयोगाने परवानगी द्यावी

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव परदेशी दौऱ्यावर आहेत. ते लवकरात लवकर येऊन आपल्या सेवेत रुजू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच निवडणूक आयोगाने आचारसंहितेत दुष्काळ संदर्भात काम करण्यासाठी सूट दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली. निवडणूक आयोगाने तात्काळ दुष्काळाच्या कामासाठी सवलत दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.