दारुच्या अंमलात दोघांना चिरडले, पोलिसांनी केला पाहुणचार, 15 तासांच्या आत आरोपी तुरुंगाबाहेर; पुणे पोर्शप्रकरणात जनता जाब तर विचारणारच

| Updated on: May 21, 2024 | 3:32 PM

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्श कार अपघातातील घटनाक्रम आणि कारवाई यावर जनतेने सवाल उभे केले आहेत. एक अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेत असेल आणि पोलिस त्याला पिझ्झा खाऊ घालत असतील तर प्रश्न उठणारच...

दारुच्या अंमलात दोघांना चिरडले, पोलिसांनी केला पाहुणचार, 15 तासांच्या आत आरोपी तुरुंगाबाहेर; पुणे पोर्शप्रकरणात जनता जाब तर विचारणारच
Follow us on

पुण्यात एका अल्पवयीन मस्तवाल तरुण मित्रांसोबत दारुची पार्टी करतो. मद्याच्या अंमलाखाली बेदरकारपणे आलिशान कार चालवतो. रस्त्यावरील बाईकला जोरात ठोकरतो. त्यात दोन तरुण अभियंत्याचा प्राण जातो. पण अवघ्या 15 तासांत त्याला उपदेशाचे डोस देऊन सोडण्यात येत असेल, तर पोलिसांच्या या कारवाईवर संशय उपस्थित होते, प्रश्नांची सरबत्ती झाली तर चुकले काय? या अल्पवयीन तरुणाला लागलीच जामीन मिळाल्याने नवीन वाहन कायदा पण प्रश्नांच्या फेऱ्यात आला आहे. आरोपी ताब्यात असताना त्याला पोलिसांनी त्याला खास पाहुण्यासारखी वागणूक दिली. त्याला पिझ्झा-बर्गर आणून दिला. मग सोशल मीडियावर पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघणार नाही तर काय होईल?

श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा

  • या दुर्घटनेत मध्यप्रदेशातील दोन अभियंते अनिश आणि अश्विनी यांचा मृत्यू ओढावला. ही कार पुण्यातील श्रीमंत विकासकाचा, बिल्डरचा 17 वर्षांचा मुलगा चालवत होता. वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी त्याला चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक जमावाने त्याला चोपत पोलिसांच्या हवाली केले. पण अवघ्या 15 तासांतच त्याची सूटका झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
  • बाल न्यायमंडळाने आरोपीला जामीन दिला. मंडळाने त्याला रस्ता दुर्घटनेवर एक निबंध लिहायला सांगितला. येरवडा पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्याची शिक्षा सुनावली. दोन जणांचा जीव घेणाऱ्याला केवळ निबंध लिहिणार आणि ज्यांचा मुलगा, मुलगी हरवली, ते आयुष्यभर न्यायाच्या प्रतिक्षेत अश्रू ढाळणार का, असा सवाल विचारण्यात गैर ते काय?

आरोपीला मदत तरी कुणाची?

हे सुद्धा वाचा

आरोपी नाबालिक आहे म्हणून काय झाले, त्यामुळे दोन जीव गेले, त्याचे काय, असा सवाल पीडित कुटुंब विचारत आहे. रविवार असताना कोणते न्यायालय उघडे असते, हा महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या घटनेनंतर पुण्यातील एका पबमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्याठिकाणी आरोपी दारुची पार्टी करताना दिसत आहे. पण पोलिसांचा सुरुवातीचा अहवाल मात्र तो दारु पिला नसल्याचे सांगत नामनिराळा झाला. कायदा वाकवला तसा वाकतो, हे तर या प्रकरणाने देशाला दाखवून दिले नाही ना? पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे. मग पोलिस आरोपीला व्हीआयपी वागणूक का देत आहे? पिझ्झा-बर्गरसाठी धावा-धाव का करत आहे. या ठिकाणी श्रीमंताचा दिवटा नसता तर पोलिसांनी अशी सरबराई केली असती का? असे अनेक सवाल समोर आले आहे.

सोशल मीडियावर पुणे पोलिसांवर प्रहार

सोशल मीडियावर पुणे पोलिसांच्या एकूणच कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तर बाल न्याय मंडळाने दिलेला आदेश पण ट्रोल होत आहे. कार अपघातात एखाद्याचा बळी घेतला आणि निबंध लिहिला तर शिक्षा पूर्ण होते का? असा सवाल सोशल मीडियावर विचारल्या जात आहे. X वर काहींनी केवळ निंबध लिहिला तर वाहन परवाना मिळतो का? असा उपरोधिक टोला हाणला आहे.अर्थात या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांनी त्यांची भूमिका मांडली आहे.