पहिली टीम आली, दुसरी टीम लवकरच येणार, राज ठाकरे आपल्या ‘त्या’ विधानावर ठाम; काय होतं वक्तव्य?

| Updated on: Jul 26, 2023 | 1:10 PM

मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्ष लागतात. कशाला लागतात? हे फेल्युअर आहे. अमेरिकेत एक एम्पायर स्टेट इमारत आहे. आयकॉनिक इमारत आहे. इतकी उंच इमारत 14 महिन्यात बांधली.

Follow us on

पुणे | 26 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची एक टीम आली. दुसरी टीम लवकरच येईल, असं विधान केलं होतं. त्याच विधानाचा राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला आहे. आजही राष्ट्रवादीचे होर्डिंग्ज लागलेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो आहे ना… किती खोटं सुरू आहे. काही मर्यादा आहे का. मी म्हणालो होतो ना, पहिली टीम आली, दुसरी जातेय. ते हेच आहे, असं सांगतानाच तुम्ही शरद पवार यांचं राजकारण किती वर्षांपासून पाहताय? मी खूप वर्षांपासून बघतोय. ही मिलीभगत आहे, असं विधानच राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे हे पुण्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यात विरोधी पक्षनेता नाही, याकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर विरोधी पक्षनेता जाऊ द्या. विरोधी पक्ष कोणता आहे ते मला सांगा. मला काही कळतंच नाही. आमचाच पक्ष विरोधी पक्ष वाटतो. बाकींच्याचे लागेबांधे आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. अजित पवार यांना जेलमध्ये टाकू म्हणणाऱ्यांनीच त्यांच्याशी युती केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे किती काळ चालणार?

रस्त्यांच्या कामावरूनही त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर नाव न घेता टीका केली. गेल्या 17 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग बांधण्याचं काम सुरू आहे. एवढी वर्ष लागतात? हे किती काळ चालणार? विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रस्त्याचं खातं आहे ते केंद्रातील मंत्री मराठी आहेत. अन् महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत. यासारखं दुर्देव नाही, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

वानरच पुढारलेले होते

मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्ष लागतात. कशाला लागतात? हे फेल्युअर आहे. अमेरिकेत एक एम्पायर स्टेट इमारत आहे. आयकॉनिक इमारत आहे. इतकी उंच इमारत 14 महिन्यात बांधली. रामाला वनवास झाला. सीतामाई, लक्ष्मणाला घेऊन ते दंडकारण्यात गेले. तिथे आल्यावर कुटी केली. तिथे सीतामाईला हरण दिसलं. लक्ष्मणाने रेषा ओढली. त्यानंतर साधू आला. सीतामाईने लाईन ओलांडली. रावणाने सीतामाईला पळवलं. पुढचं रामायण घडंल. रावणापर्यंत जाण्यासाठी वानराने सेतू बांधला. लढाई झाली. 12 वर्षानंतर सीतामाईला घेऊन राम अयोध्येत आले. वांद्रे वरळी सी लिंकला 10 वर्ष लागलेत. तेच (वानर) बहुधा पुढारलेले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

दुर्घटना टाळली जाऊ शकते

इर्शाळवाडी दुर्घटनेवरून त्यांनी सरकारवर टीका केली. तरुणांचा एक गट मला उद्या भेटणार आहे. या मुलांनी राज्यातील धरण, दरडी आणि इतर परिस्थितीचा अभ्यास केला आहे. कुठे धरण कोसळू शकते? कुठे अपघात होऊ शकते त्याचं डिटेल आम्ही आधी देऊ शकतो असं या तरुणांचं म्हणणं आहे.

सरकार अपघात टाळू शकते. पण सरकार त्या मुलांना भेट देत नाही. हे अपघात थांबू शकतात. पण सरकारकडे वेळच नाही लक्ष द्यायला. सरकार म्हणून काळजी घेतलीच पाहिजे. किती माणसं गाडली जाणार? तुमच्याकडे व्यवस्था असताना अपघात घडत असतील तर काय म्हणायचं? असा सवाल त्यांनी केला.