शरद पवार यांचं पाटण्याला जाण्यापूर्वी मोठं विधान, सर्वांच्याच भुवया उंचावल्या; विरोधी पक्षांच्या बैठकीत फक्त…

| Updated on: Jun 23, 2023 | 7:54 AM

देशातील सर्व विरोधी पक्षनेते आज पाटणा येथे जमत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 23 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार यांचं पाटण्याला जाण्यापूर्वी मोठं विधान, सर्वांच्याच भुवया उंचावल्या; विरोधी पक्षांच्या बैठकीत फक्त...
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रमेश शर्मा, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : बिहारच्या पाटण्यात आज सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. 2024च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या बैठकीला जाण्यासाठी निघताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीत 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार जागा कशा लढवायच्या? भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार कसा द्यायचा? या बाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचा राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अंदाज व्यक्त केला जात असतानाच शरद पवार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच आजच्या बैठकीत काय चर्चा होणार यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

रणनीतीवर चर्चा नाहीच

शरद पवार हे आज पुण्यातील मोदीबागेतून पाटण्याकडे जायला निघाले. जाताना त्यांनी पाच मिनिटं मीडियाशी संवाद साधला. आजच्या बैठकीच्या स्वरुपावर त्यांनी भाष्य केलं. आजच्या बैठकीत 2024ची रणनीती ठरणार आहे काय? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आलं असता, हे आज सांगता येणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आजच्या बैठकीत 2024च्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या विषयावर चर्चा होणार

आजच्या बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. देशाच्या काही राज्यात मणिपूर वगैरे आदी ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावरून आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथेच हे प्रकार घडत आहेत. या मागे कोण आहे हे स्पष्ट होत आहे. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यावर एकत्रित विचार करून पुढची लाईन ठरवण्यात येणार आहे. तसेच इतर राज्यातील नेते काही मुद्दे उपस्थित करतील. पण ते आज सांगता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आजच चमत्कार नाही

शरद पवार यांनी आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पवार यांच्या सुरात सूर मिसळला आहे. आजच काही चमत्कार होणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चांगली सुरुवात होईल

कदाचित 2024ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याची आपली जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर पाटण्यात महत्त्वाची बैठक होत आहे. त्यासाठी सर्व नेते पाटण्यात चालले आहेत. सकाळी 11 वाजता बैठक सुरू होईल. संध्याकाळपर्यंत बैठक चालेल. एकत्र जमणं हे महत्त्वाचं आहे. आजच चमत्कार होईल असं नाही. पण एकत्र जमून चर्चा करून काही पावलं कशी टाकता येईल? काय करता येईल? एकास एक उमेदवार कसे देता येईल यावर चर्चा होईल. मतभेद विसरून एकत्र येत आहोत. मंथन होईल. विचार होईल. चांगली सुरुवात होईल, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा आजचा पाटणा दौरा असा असेल

सकाळी 8 वाजता मुंबई विमानतळावरून खासगी विमानाने पाटण्याच्या दिशेने रवाना.

सकाळी 10 वाजता पाटणा येथे आगमन.

त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट.

11 वाजता पाटणा येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थिती.

पत्रकार परिषदेला संबोधण त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता खाजगी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना.

संध्याकाळी 7 वाजता मुंबई विमानतळावर आगमन.