तळ्यावर अंघोळीला गेले ते परतलेच नाही, दोन सख्ख्या भावांचा करूण अंत; कुठे घडली घटना?

| Updated on: May 29, 2024 | 4:52 PM

राज्यात आज तीन ठिकाणी पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापुरात एक तरुण बुडून मेला आहे. नगरमध्येही एक मुलगा नदीत बुडून मरण पावला आहे. या घटनांमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

तळ्यावर अंघोळीला गेले ते परतलेच नाही, दोन सख्ख्या भावांचा करूण अंत; कुठे घडली घटना?
Nashik lake
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिकच्या निफाड तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. दोन सख्खे भाऊ शेततळ्यावर आंघोळीला गेलेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. निफाड येथील नांदुर्डी रोडवर असलेल्या ढेपले वस्तीवर ही घटना घडली. प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले असे दोघे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करून शेततळ्यावर आंघोळीसाठी दोघे शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती. मात्र अर्धा तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी त्यांना शोधण्यासाठी गेली. जवळपास शोध घेतला असता जवळच्या शेततळ्याजवळ एका मुलांचे कपडे त्यांना आढळून आले. मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र शेततळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता.

आधी छोटा भाऊ पाण्यात उतरला

प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा आधी तळ्यात उतरला असावा. मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला. त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेचे वृत्त समजतात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

नगरमध्ये तरुण बुडाला

नगरच्या कोल्हार येथेही एक जण नदीत बुडून मरण पावला आहे. कोल्हार गावातील बागमळा येथील प्रवरा नदीत पोहण्यासाठी तिघेजण गेले होते. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. अविनाश जोगदंड असं या मुलाचं नाव असून तो अवघा 15 वर्षाचा आहे. या तरुणाचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. स्थानिक त्याचा शोध घेत आहेत. शिर्डी आणि कोपरगाव येथून बचाव दल मागवण्यात आलं असून तरुणाचा शोध घेतला जात आहे. मात्र, या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सोलापुरात एकाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रामवाडी येथील भीमा नदीच्या पात्रात 17 वर्षीय ऋषिकेश बाळासाहेब वारगड या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऋषिकेश हा भीमा नदीपात्रातील मोटारकडे जात असताना नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.