“माझी हात जोडून विनंती…”, महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांचे आवाहन, म्हणाले “पक्ष म्हणून…”

| Updated on: Jul 25, 2024 | 3:06 PM

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटीचा वापर करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

माझी हात जोडून विनंती..., महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांचे आवाहन, म्हणाले पक्ष म्हणून...
Follow us on

Raj Thackeray On Maharashtra Floods : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड, सातारा, सांगली या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे सर्वत्र रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सिंहगड रोड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटीचा वापर करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. माझी सर्वांना हातजोडून विनंती आहे. जिथे पूर आला आहे, जिथे घरात पाणी साचलंय, प्रत्येक घरात जा आणि मदत करा. पक्ष म्हणून मदत करु. पण तुम्हीही वैयक्तिक जाऊन लोकांना भेटा. त्यांना मदत करा, असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.

दोनशे ते २५० जागा लढवणार

राज ठाकरेंनी या मेळाव्यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांबद्दलची रणनीतीही सांगितली. आपण जवळपास सव्वा दोनशे ते २५० जागा लढवणार आहोत. युती होईल का? जागा मिळतील का? असा निर्णय मनात आणून नका. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काहीही करुन काही लोकं सत्तेत बसवायचे आहेत. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

1 ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू

निवडून येण्याची कॅपेसिटी असलेले, तयारी असलेल्यांना तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही. तुम्ही मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुमची वर्णी लागेल असं समजू नका. सर्व गोष्टी चेक करणार. त्यामुळे टीम येईल, तुम्हाला फोन करेल, बोलतील. त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल. त्यानंतर पावसापाण्याचा विचार करून १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

“आजच्या बैठकीला बोलावण्याचं कारण म्हणजे पक्षातील एक चार पाच जणांची टीम केली आहे. तुम्हाला माहीत नसेल, ते तुमच्या तालुक्यात येऊन गेले. सर्व्हे झाला. ते पत्रकारांशी बोलले. त्यानंतर आता परत ते चार पाच दिवसात तुमच्याकडे येतील. तुम्हाला भेटतील. तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, ते त्यांना सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकते, काय करता येऊ शकतं, याचा विचार करा”, असेही राज ठाकरे म्हणाले.