विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वारंवार चर्चा होत आहे. 2022 ला मुख्यमंत्रिपदावेळी आम्ही त्याग केला. आता यावेळी तुम्हीही झुकतं माप घ्या, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे हे निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावर नसतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.
निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. यावरही सत्तार यांनी भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जागा वाटापचा फॉर्म्युला 88 टक्के तयार करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत तो जाहीर करण्यात येणार आहे, असंही अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. विधानसभेत जरांगे फॅक्टर चालेल का? असा प्रश्न विचारला असता सत्तार यांनी त्याला उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे हे समाजाची लढाई लढत आहेत. त्यांना कुणीही कमी लेखू नये, मनोज जरांगे राज्य मधील पुढाऱ्यांप्रमाणे आयकॉन झाले आहेत, असं सत्तार म्हणाले.
आता काहीजण इकडून तिकडे जात आहेत. ज्याच्या घरात वडीलोपार्जित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार रुजलेले असलेले व्यक्ती आज उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या देतात. अशा माणसाकडे स्थानिक संघावाले जात आहेत. अशा व्यक्ती कसं काय मतं मागणार? असा टोला सत्तार यांनी आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणाऱ्या सुरेश बनकर यांना लगावला आहे. मी मतदार संघात मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय आणि एमआयडीसी आणत असूनही मला यामध्ये विरोधक अडथळे निर्माण करत आहेत. यासाठी काहीजण तर कोर्टात गेले आहेत, असंही सत्तार म्हणालेत.