माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल… निलेश राणे साहेबांनी नितेश साहेबांना समजून सांगावं. देवेंद्र फडणवीससाहेबांनी अभियान राबवायला सांगितलं आहे. ते राबवत आहेत. आम्ही विश्वास टाकलाय ठरलेलं द्या, पण हे बिलिंदर लोकमध्ये टाकतायेत. मला ट्रॅप केलं जात आहे. सत्ता देवेंद्र फडणवीस साहेब चालवत आहेत. त्यामुळे भाजप वाटोळं होतंय. फडणवीस रोषाचे धनी होतायेत. आमच्या लेकरांना माता माऊलींजवळ म्हणायचं तर पोलीस माझे आहे असे बोलतात… फडणवीससाहेब आमच्या आई बहिणीला बोलले, आम्ही सहन करायचं का? सरकारसोबत शून्य संपर्क आहे. आता जोवर सहन होतंय तोपर्यंत करू आणि नंतर सगळंच बाहेर काढू, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणालेत. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माझी तब्येत बरी नाही. मात्र 27 तारखेला गावाला दर्शनाला जाणार आहे. देवेंद्र फडणवीससाहेब गेली 13 , 14 वर्ष काही झालं नाही. मग माझ्यावरच आता कारवाई का? मीच का गोरगरिबांसाठी लढतोय म्हणून… पुण्यात जाऊन मी जमीन घेऊन आलो. आता नोटीस नाही डायरेक्ट वॉरंट, का हे घडवून आणतात. मला बदनाम करण्यासाठी, मला आधीही कुठलीही नोटीस आली नाही. हे फडणवीस साहेबांना शोभत नाही. अभियान बदनाम करू नका. तुम्ही गोडी गुलाबीने हाताळले तर तुमच्या अंगलट येणार नाही, असं आवाहन मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.
उपोषण सुरू असताना तिथं बसून काम होत नव्हतं. आता इथं बसून काम होईल. मी कामाला लागलोय. सरकार ऐकायला तयार नाही, लोक ऐकत नाहीत. मी या आधीही सलाइन काढून टाकलं. पण वेळ जातो आणि काम करायचं होतं. सरकारवर विश्वास नाही, असा शब्द मी वापरणार नाही. नवी डेडलाईन त्यांनी मागितली होती. म्हणून 13 ऑगस्टेपर्यंत वेळ दिली. शंभूराज देसाई म्हटले होते, वेळ लागेल. पण काल मी रात्री बरेच उमेदवार निवडले. निवडणुकीचं काम सुरू केलं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मुंबईत भेट झाली. या भेटीत मराठा-ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावरही मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आमच्या बाजूने काही बोलले असतील, असं वाटत नाही आणि बोलले असतील तर थेट बोलावे ना… लपवायचं काय त्यात…., असं मनोज जरांगे म्हणाले.