यंदाची लोकसभा निवडणूक ही विविध मुद्द्यांनी गाजली. भाजपने 400 पारचा नारा दिलेला असताना भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. जालन्याच्या जागेवरही भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून मेहनत घेतली. मात्र अपयश आलं नाही. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू. राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भाजपाला राज्यात बसला, असं रावसाहेब दानवे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रावसाहेब दानवे स्थानिकांशी संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी निवडणुकीतील मुद्द्यांवर भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे सध्या मतदारसंघात मंथन- आभार दौरा करत आहेत. स्थानिकांशी ते संवाद साधत आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्यें भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचा दिसलं. त्यामुळं कार्यकर्त्यांना या अपयाशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरु केला. 13 तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता सर्कल वाईज बैठका देखील घेणार आहे, असं यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले.
जालन्यातील पराभवावर दानवेंनी भाष्य केलं. कुणा एका व्यक्तीमुळे आपला पराभव झाला नसल्याचं ते म्हणालेत. माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधक काम केलं, असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही, असं विधान दानवेंनी यावेळी केलं.
लोकसभा निवडणुकीतील पराभव हा कुणा एका व्यक्तीमुळे आमचा पराभव झाला नाही. राज्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल झालं आणि त्याचा फटका पक्षाला बसला. अब्दुल सत्तारच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं दानवे म्हणाले.