जणू काही 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले होते, संजय राऊत यांची जोरदार टीका

| Updated on: Jun 19, 2024 | 8:52 PM

भाजपा आता लोकसभा निवडणूकीनंतर राज्यात आभार यात्रा काढत आहेत असा उल्लेख करीत संजय राऊत पुढे म्हणाले की रामाने तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार कसले मानता? असा टोला लगावला.

जणू काही 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले होते, संजय राऊत यांची जोरदार टीका
sanjay raut news
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई – शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिवस साजरा होत आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीत महायुतीचा मोठा पराभव झाल्यानंतर आणि महायुतीला सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर शिवसेनेचा हा वर्धापन सोहळा होत आहे. शिवसेनेते बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळूनही लोकसभेत उद्धव ठाकरे याच्या शिवसेना गटाने चांगली लढत दिली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने आज मुंबईत वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. शीव येथील षण्मुखानंद सभागृहातील ठाकरे गटाच्या वर्धापन सोहळ्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण केले. महाराष्ट्र कधी परकीय आक्रमणापुढे झुकला नाही. गुजरातचे कोणी सोमे गोमे हवेश नवशे चारशे पार करायला आले होते. त्यांना रामभक्तांनी त्यांची जागा दाखविली असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की देशाच्या राजकारणात सध्या हीरो ठरलेले उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीला स्वागत केले. ते म्हणाले गुजरातच्या सोमेगोमे 400 पार करायला निघाले होते. जणू काही 400 हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. ते जन्माला आल्यावर 400 खुळखुळे घेऊन आले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना पराभूत केलं. आम्हाला कुणी हरवू शकत नाही अशा फुशारक्या मारणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन वरळीच्या डोम सभागृहात सुरु आहे. त्याचा उल्लेख करुन संजय राऊत पुढे म्हणाले की ते डोम का काय आहे ना ? त्यामध्ये डोमकावळे जमले आहेत. आमचा 58 वा वाढदिवस आहे. त्यांचा अडीचवा वाढदिवस आहे.

मोदी ब्रॅंडची…ब्रॅंडी झाली..

शिवसेना प्रमुखांना वेळ जात नव्हती म्हणून शिवसेना स्थापन केलेली नाही. गुजरातचे सोमे गोमे हवशे गवशे आले आणि शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली नाही. हे स्वप्न कुणी पाहू नये. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे असे सांगत संजय राऊत पुढे म्हणाले की मी यासाठी म्हणतोय कारण छत्रपतींनी आपली मान दिल्लीच्या तख्तासमोर झुकवली नाही. त्याच महाराष्ट्राचा वारसा बाळासाहेबांनी चालवला. भाजप आता ‘आभार यात्रा’ काढणार आहे म्हणे. कशासाठी महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. मोदींना बहुमत मुक्त केल्यामुळे 400 पार करणार होते. 200 केले म्हणून आभार मानता. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला बहुतेक. मोदी ब्रँड होता ना?. ब्रँडी झाली आहे बहुतेक त्याचा देशी ब्रँडी झाली आहे. या नशेत ते असे काही करत आहे. तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार कसले मानताय? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.