आज किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर जमले आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यानिमित्ताने वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
किल्ले शिवनेरीवर आज फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न झाला. मंत्री नितेश राणे यांनी पाळण्याची दोरी ओढत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. नितेश राणे यांच्या हस्ते शिवनेरी स्मारक समितीतर्फे समाजात चांगल्या कामाबद्दल पुरस्कार वितरण करण्यात आले.
नितेश राणे शिवनेरी गडावर असताना मधमाशांचा हल्ला झाला. या मधमांशांना अज्ञातांनी डिवचल्याने त्यांनी हा हल्ला केल्याची माहिसी समोर येत आहे. मधमाशांच्या या हल्ल्यात १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जोपर्यंत मधमाशा शांत होत नाही, तोपर्यंत शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे वनविभागाने जाहीर केले आहे. तसेच या मधमाशांना डिवचणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान काल रविवारी (१६ मार्च) किल्ले शिवनेरी गडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. शिवजयंतीच्या तयारीसाठी रविवारी गडावर आलेल्या शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी घेतलेल्या चाव्यामध्ये ४७ जण जखमी झाले. पर्यटनासाठी गेलेल्या काही तरुणांनी पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशा चवताळल्या. यानंतर त्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे बोललं जात आहे. तर शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांच्या हातातील मशालीच्या धुरामुळे या मधमाशा सैरभैर झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप यामचे कारण समोर आलेले नाही.
काल शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर वनविभाग, पुरातत्व विभागाचे कर्मचारी, जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यात ४७ पैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.