Gulabrao Patil On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जात आहे. आता या लाडकी बहिण योजनेवरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. “कोणी कितीही लालसा देऊ द्या, एकवेळ पुरुष बेईमान होतील. पण माझ्या बहिणी कधीच बेईमान होणार नाहीत”, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगावात बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले. “जर पुन्हा आमचं सरकार आलं, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरुन तीन हजार करु, अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे”, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
“आमचे मुख्यमंत्री महिलांसाठी खूप प्रयत्न करत आहेत. आता मुलगी जन्माला आली की कंटाळा करायचं काम नाही असं काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. योगायोगाने सर्व दाढीवाले वरती बसले आहे. नरेंद्र मोदी दाढीवाले, एकनाथ शिंदे दाढीवाले आणि गुलाबराव पाटील सुद्धा दाढीवाला. एखादा निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे”, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
“एसटीमध्ये महिलांना अर्धे तिकीट केल्यामुळे आता एसटी पटापट भरायला लागलेली आहे. हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोणत्याही दवाखान्यामध्ये जा. उपचारासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा करणारा हा आमचा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने एवढे सुंदर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एस. टी मध्ये अर्धे तिकीट, तीन सिलेंडर आणि लाडकी बहीण अशा महिलांसाठी खूप योजना या सरकारने सुरु केल्या आहेत. वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचे काम कोणी केलं असेल, तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी केला आहे”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
“एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आणली आणि आता लाडक्या बहिणींचा खात्यावर पैसे जमा व्हायला लागले. लोक अफवा पसरवत आहेत की निवडणुका आहे म्हणून पैसे आले. पण कोणी कितीही लालसा देऊ द्या, आदमी बेईमान हो जाएगा, मगर मेरी बहन बेईमान नही होगी. त्यामुळे लाडक्या बहिणी हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचे सरकार निवडून देणार” असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे की जर पुन्हा आमचं सरकार आलं तर दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करु. अनेक लोक आपल्याला वेड बनवायला येतील, मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकांना पंढरपूरला माझ्यावर टीका झाली की निवडणूक आल्या म्हणून तुम्ही लोकांना पंढरपूर नेलं. मी पंढरपूरला नेलं. कमीत कमी तू वणीच्या गडावर तर घेऊन जा. वणीच्या गडावर नाही तर जळगावच्या जिल्ह्यातच मनुदेवीवर तरी घेऊन जा. नुसतं भाषण करून चालत नाही आम्ही ते करून दाखवला आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.