राज साहेब… त्यात तुमचाही एक चमचा आहे; किशोरी पेडणेकर यांचा ‘त्या’ विधानावरून हल्लाबोल

| Updated on: Oct 12, 2024 | 3:36 PM

लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तोच निकाल आताही लागणार आहे. महायुतीवाले दोन डीजिटमध्येच राहतील. मुख्यमंत्री म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत आहोत, असं ठाकरे गटाच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

राज साहेब... त्यात तुमचाही एक चमचा आहे; किशोरी पेडणेकर यांचा त्या विधानावरून हल्लाबोल
किशोरी पेडणेकर यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आज दसऱ्या निमित्ताने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारण बिघडलं आहे, राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाचा माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला आहे. राज्यातील राजकारण बिघडलंय. हे खरं आहे. राज ठाकरे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. पण हे राजकारण बिघडवण्यात राज साहेब तुमचाही एक चमचा आहेच, असा हल्लाच किशोरी पेडणेकर यांनी चढवला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या पाच वर्षात राजकारण नक्कीच बिघडले आहे. परंतु ते बिघडण्यामध्ये एक चमचा तुमचा देखील आहे. 40 आमदारांची गद्दारी झाली, त्यावेळेस तुमच्याकडे येत होते. तेव्हा त्यांना तुम्ही छाती ठोकून का नाही सांगितलं? राजकारण आम्ही बिघडवलं म्हणत असतील तर राज ठाकरेंनी काय केल? राज यांचा पण काहीतरी वाटा आहे की? ज्यावेळी तुमच्याकडे ते पायघड्या घालत होते, त्यावेळेस त्यांना ठणकावून का नाही सांगितलं? हे बिघडवण्यामध्ये खारीचा वाटा तुमचा पण आहे, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला.

नाव घेऊन बोला

राज ठाकरे यांना भेटला नाही असा भाजपचा एकही नेता राहिला नाही. सर्वच नेते भेटून जात आहेत. तुम्हाला लोकांनी नाशिकमध्ये संधी दिली होती. पण तिथे काय झालं? कोण काय आहे हे लोकांना माहीत आहे. संधी द्यायची की नाही हे लोकं ठरवतील. सोनं दुसरे लुटून नेत आहेत. दुसरे कशाला? जे लुटून नेत आहेत. त्यांची नावे घ्या. आम्ही सरळ नाव घेऊन बोलतो. तुम्हीही नाव घेऊन बोला, असा हल्लाही किशोरी पेडणेकर यांनी चढवला.

तेच टॉनिक आमचं सुरूय

मी मुद्दाम दसरा मेळाव्याचं काऊंट करत असते. कारण गेली दोन वर्ष इतर ठिकाणीही दसरा मेळावा होत आहे. आमचा दसरा मेळावा सलगपणे होत आहे. फक्त दोनदा नैसर्गिक आपत्तीमुळे झाला नव्हता. एक नेता, एक झेंडा, एक जागा आणि तेच टॉनिक आमचं सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.

इकडे दसरा, तिकडे पसरा

गेल्या अडीच वर्षात इकडे दसरा आणि तिकडे पसरा असं चाललंय… शिंदेंनी शिवसेना हायजॅक केल्यानंतर काय काय करतायत हे जनता पाहत आहे. निवडणूक घ्यावी लागत आहे…. जेव्हा आचारसंहिता लागेल तेव्हा आम्ही म्हणू की निवडणूक आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

मंत्रीपद मिळालं म्हणून पळाला

उदय सामंत सांगत होते याच्या आधी गद्दारी झाली नाही का? अहो, तुमच्या एवढी हिम्मत कोणी केली नाही. हा एक दोन महिन्याचा प्रकार नव्हता तर हा दोन वर्षाचा प्रकार होता. तुम्हाला पद मिळालीत, मंत्री पद मिळाले म्हणून तुम्ही पळून गेला, असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला